संकटाकडे गांभीर्याने पहा : नागरिकांनी घरीच थांबण्याचे सेलिब्रिटींनी केले आवाहन
पिंपरी – देशभरात सध्या आलेले करोना आजाराचे संकट पाहता गांभिर्याने या बाबीकडे पाहणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचना लक्षात घेऊन नागरिकांनी “सोशल डिस्टसिंग’ ठेवावे. स्वच्छता पाळावी. “मास्क’चा वापर करावा. सर्वांनी मिळून निर्धार केल्यास करोनाच्या संकटावर आपण मात करू शकू. लोकांनी रस्त्यावर फिरण्यापेक्षा पूर्णत: घरात थांबणे गरजेचे आहे, असे आवाहन सेलिब्रिटींनी “दै. प्रभात’शी बोलताना केले.
करोनामुळे सुरू असलेल्या “लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर स्वत: सेलिब्रिटी घरी बसून काय करीत आहात, याबाबत उत्सुकता होती. त्याविषयी सेलिब्रिटींचे “होम क्वारंटाइन’मधील दिनचर्या व्यक्त केली. तसेच, करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहनही केले.
पॅनिक होऊ नका
– सावनी रवींद्र (प्रसिद्ध गायिका) : मी सध्या चिंचवडला माझ्या आई-बाबांकडे आहे. वडील डॉ. रवींद्र घांगुर्डे हे माझे गुरू असल्याने त्यांच्यासोबत गाण्याचा रियाज करते आहे. नवीन गाणी, बंदिशी शिकते आहे. त्याशिवाय, दररोज योगसाधना, आईला स्वयंपाकात मदत करते आहे. सोशल मीडियावर चाहत्यांशी “कनेक्ट’ राहते आहे. त्यांच्यासोबत संवाद साधते आहे. करोना आजाराचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी घरी थांबणे गरजेचे आहे. पंतप्रधानांनी रविवारी (दि. 22) नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले होते. त्या वेळी देखील नागरिक घराबाहेर पडून फिरताना दिसत होते. सध्या देशभरात “लॉकडाऊन’ सुरू आहे. तरीही नागरिकांना त्याचे गांभीर्य दिसत नाही. नागरिकांनी “पॅनिक’ न होता शांतपणे आणि तटस्थतेने या परिस्थितीला सामोर जायला हवे.
“सोशल डिस्टंसिंग’ गरजेचे
– सायली सांभारे – राजहंस (प्रसिद्ध अभिनेत्री व गायिका) :माझे सध्या वाचन, लिखान सुरू आहे. त्याशिवाय, गायनाचा असलेला माझा आवडता छंदही मी जोपासते आहे. “स्त्री लिखित मराठी कविता’ या पुस्तकाचे वाचन सध्या मी सुरू केले आहे. त्याशिवाय, काही कवितांचे लेखनही मी करत आहे. काही मनातलं, काही पानातलं.. असा “ऑनलाइन लाइव्ह’ अभिवाचनाचा कार्यक्रम करण्याचे देखील माझे नियोजन आहे. सध्या “लॉक डाऊन’मुळे घरीच राहावे लागत असल्याने प्रत्येक व्यक्ती आपापला छंद जोपासू शकते. आपल्याला व इतरांना संसर्ग होऊ नये, यासाठी “सोशल डिस्टंसिंग’ ठेवणे खूपच गरजेचे आहे. आपण सर्वांनी मिळून करोनाच्या संकटावर जोरदार प्रहार करण्याचा निर्धार करायला हवा. या माध्यमातून नागरिकांना देशभक्ती दाखविण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
नागरिकांमध्ये जागरूकतेचा अभाव
– आशा नेगी (प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल) : मी सध्या घरी मुलांसोबत वेळ घालवते आहे. मला लिखाणाची आवड आहे. त्यामुळे मी सध्या लिखाण करते आहे. चांगल्या पुस्तकांचे वाचन चालू आहे. मी “फिटनेस लव्हर’ असल्याने सध्या दररोज एक ते दीड तासाचा “वर्कआऊट’ करते आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत नागरिकांमध्ये गांभीर्य आणि जागरूकतेचा अभाव आहे. लोकांना सध्या मिळालेली सुट्टी ही सरकारी सुट्टीसारखी वाटते आहे. रमतगमत भाजी खरेदीसाठी बाहेर पडणे, मेडिकलमध्ये औषध खरेदीसाठी जाताना मास्कचा वापर न करणे, हे सर्रास पाहण्यास मिळत आहे. सगळ्यांनी आपल्या घरातच सुरक्षित राहावे आणि कुटुंबियांना देखील सुरक्षित ठेवावे. अहोरात्र घराबाहेर राहून झटणारे डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांना माझा सलाम..!
सकारात्मक प्रतिसाद हवा
डॉ. संजीवकुमार पाटील (प्रसिद्ध अभिनेते) :मी कुटूंबियांसमवेत सध्या वेळ घालवतो आहे. जुन्या नाटकांचे व्हिडिओ पाहत आहे. पीडीएफ स्वरूपात आलेल्या पुस्तकांचे वाचन करीत आहे. विविध गाणी ऐकत आहे. योगासने, व्यायाम, सूर्यनमस्कार सुरू केले आहे. त्याशिवाय, गाण्याच्या भेंड्या खेळणे, दमशिराज असा विरंगुळा सुरू आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना आपण सकारात्मक प्रतिसाद द्यावा. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींशिवाय इतरांनी घरी बसायला हवे. आपण घरात बसून स्वत:बरोबरच कुटुंबाची आणि देशाचीही काळजी घेणार आहोत. आपण आत्ताच स्वत:ला सावरले नाही, तर चीन आणि इटलीपेक्षा भयानक परिस्थिती उद्भवेल. करोनाची लक्षणे दिसताच त्यानुसार वैद्यकीय उपचार घ्यायला हवे.