लॉकडाऊनमुळे कोलमडले बजेट; हातावर पोट असणाऱ्यांना झळ; खासगी कर्मचारीही अडचणीत
– संतोष पवार
सातारा – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. हातावर पोट असणाऱ्यांना सर्वाधिक झळ बसली असून खासगी आस्थापनांमधील कर्मचारीही अडचणीत आहेत. सर्वांना आधार द्यायचा प्रयत्न सरकार करत असले तरी कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा याची विवंचना सर्वसामान्यांना आहे.
जगभरात करोनाने हाहाकार माजवला असून भारतातही याचा फैलाव झाला आहे; परंतु केंद्र आणि राज्य सरकारने अनेक निर्णय घेऊन त्यावर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील करोनाबाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने राज्य सरकारने अनेक पावले उचलून नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सरकारने काही कटू निर्णयही घेतले असून सोशल डिस्टन्सिंग राखण्यात पुढाकार घेतला आहे. देशव्यापी लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय, उद्योगधंदे बंद करण्यात आले आहेत. लॉकडाऊन पुढे आणखी किती दिवस राहील, याची कल्पना नसल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
लघुउद्योग, हॉटेल व्यवसाय, बांधकाम, औद्योगिक वसाहत व अन्य व्यवसायाशी निगडीत असलेले कोट्यवधी कामगार अडचणीत सापडले आहेत. हातगाडीवाले, किरकोळ विक्रेते, फिरते विक्रेते, कपडे इस्त्री, ड्रायक्लिनिंग करणारे व्यावसायिक, मजूर, घरोघरी जाऊन दूध विकणाऱ्यांपुढील समस्या वाढतच आहेत. अनेक व्यावसायिकांनी बॅंका, पंतसंस्थांची कर्जे काढली आहेत. अनेकांनी व्यवसायासाठी जागा, गाळे भाड्याने घेतले आहेत. आता भाड्याची रक्कम कुठून द्यायची या चिंतेने त्यांना ग्रासले आहे.
रिझर्व्ह बॅंकेने त्यांच्या नियंत्रणातील बॅंकांना तीन महिने कर्जाचे हप्ते न घेण्याच्या सूचना केल्याने काही अंशी कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सहकारी बॅंका, पतसंस्था याची अंमलबजावणी करतील की नाही, याची शाश्वती नाही. महिला बचत गट, इतर वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जांचे हप्ते कसे भरायचे याचीही विवंचना नागरिकांना आहे.लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे पुरते मोडले आहे. शहरी व ग्रामीण भागात सारखीच परिस्थिती आहे. त्यामुणे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आधार देण्याची गरज आहे. याबाबत शासनाने निर्णय घ्यावा, या मागणीने जोर धरला आहे.
घरकाम करणाऱ्यांवर मोठे संकट
शहरी भागात घरोघरी स्वच्छता, कपडे, भांडी धुणे, स्वयंपाक या कामांमध्ये अनेक महिला आहेत. करोनाच्या संकटात बहुतांश ठिकाणी घरकाम करणाऱ्या महिलांना अनिश्चित काळासाठी सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे घर कसे चालवायचे याची चिंता या महिलांना असून त्यांना शासनाकडून मदत मिळण्याची गरज आहे.