पुणे -“भारत जोडो’ यात्रेमुळे कॉंग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा संघटित होण्यास सुरुवात झाली असतानाच; पुणे शहर कॉंग्रेसमध्ये वादाचा अंक रंगला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत माजी स्थायी समिती अध्यक्ष रशिद शेख यांनी पुन्हा कॉंग्रेसमध्ये केलेला प्रवेश हा या वादाला कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.
शेख यांना पक्षात घेण्यास पक्षाचे माजी शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा विरोध होता. त्यामुळे बागवे यांना खबर लागू न देताच शेख यांना शनिवारी नाना पटोले यांनी पुन्हा पक्षात घेतले. त्यावरून बागवे नाराज असून त्यांचा मुलगा अविनाश बागवे यांनीही थेट नाराजी व्यक्त करत पक्षाच्या कार्यक्रमांना अनुपस्थिती लावली आहे. त्यामुळे, ऐन कसबा विधानसभा मतदारसंघाच्या तोंडावर कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याने त्याचा फटका पक्षाला बसणाची चिन्हे आहेत.
का उफळला कॉंग्रेसमधील वाद?
2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान रशीद शेख, सुधीर जानजोत आणि सदानंद शेट्टी हे कॉंग्रेसचे तीन माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले होते. यांपैकी शेट्टी हे वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. जानजोत अजूनही भाजपमध्येच आहेत. रशीद शेख यांचा मुस्लीम समाजात चांगला प्रभाव आहे. त्याचा फटका रमेश बागवे यांना 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत झाला. यावेळी बागवे यांचा सुमारे साडेपाच हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे शेख यांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये घेण्यास बागवे यांच्यासह अविनाश बागवे यांचाही विरोध होता. तर कॉंग्रेसमधील नाराजांना भाजपकडून संपर्क साधला जात असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.
कार्यपद्धती बदला…कार्यकर्त्यांचा सल्ला
शहर कॉंग्रेसमधील वादानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष शहरात आल्यानंतर ज्येष्ठ कार्यकर्त्यांना संपर्कात घेतले जात नाही. अनेक कार्यक्रम ठरविताना प्रदेश कार्यकारिणीवर असलेल्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रणे दिली जात नाहीत. तर, अंतर्गत वादांतून पक्षाला त्याचा फटका बसत असताना अशा प्रकारची कार्यपद्धती बदलणे आवश्यक आहे. पण, जाणीवपूर्वक असे प्रकार वारंवार घडवले जात आहेत. तसेच पक्षसंघटना मजबूत करण्यासाठीही काहीच केले जात नाही,’ असे कार्यकर्ते खासगीत सांगत आहेत.