नवी दिल्ली – काँग्रेसने शुक्रवारी देशात एकाचवेळी सर्व निवडणुका घेण्याच्या कल्पनेला तीव्र विरोध दर्शवला आहे. हे तत्व संघराज्याची संकल्पना आणि संविधानाच्या मूलभूत रचनेच्या विरोधात आहे असे कॉंग्रेसने म्हटले असून या संबंधात स्थापन केलेली उच्चाधिकार समिती बरखास्त करावी अशी मागणीही कॉंग्रेसने केली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी ही मागणी केली.
एक राष्ट्र, एक निवडणूकी संबंधात नेमण्यात आलेल्या समितीच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात खर्गे यांनी ही मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे या समितीचे प्रमुख आहेत; पण देशाची घटना मोडीत काढण्यासाठी केंद्र सरकारकडून त्यांच्या पदाचा“दुरुपयोग” केला जाऊ नये अशी विनंतीही त्यांनी या पत्रात केली आहे. खर्गेंनी म्हटले आहे की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या कल्पनेला तीव्र विरोध आहे. लोकशाहीचे बळकट स्वरूप कायम राखण्यासाठी ही संपूर्ण कल्पना सोडून देणे आणि उच्चाधिकार समिती विसर्जित करणे अत्यावश्यक आहे.
या समितीच्या सचिवांनी विविध राजकीय पक्षांप्रमाणेच कॉंग्रेसलाही एक पत्र पाठवून या प्रस्तावाबाबत त्यांच्या सुचना मागवल्या होत्या. त्या पत्राला उत्तर देताना कॉंग्रेस अध्यक्षांनी ही सुचना केली आहे. वन नेशन वन इलेक्शन अशा संकल्पना लोकशाही विरोधी आहेत आणि त्याबद्दल सतत बोलून केंद्र सरकारने लोकांचे लक्ष विचलीत करण्यापेक्षा जनादेशाचा आदर राखण्याचे काम करावे असेही खर्गे यांनी म्हटले आहे.