मुंबई – शिंदे सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार?, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेले असतानाच भाजप नेते व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वाची माहिती दिली. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. कोणत्या नेत्याला कोणते खाते दिले जाईल, याची घोषणा लवकरच केली जाईल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.
आज पत्रकारांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता महाजन म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाबाबत निकाल दिला आहे, तेव्हापासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहे. सध्या सत्तेत दोन पक्ष असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या नेत्याची वर्णी लागणार? त्याला कोणते खाते दिले जाईल?, अशी चर्चा होत असते. मात्र, या सर्व चर्चा आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. लवकरच याबाबत निर्णय होईल.
वंचितच्या प्रकाश आंबेडकरांच्या औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहण्याच्या क्रियेवर महाजन म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांच्या या कृतीचे कुणीही समर्थन करू शकत नाही. हे फक्त मतांचे लांगुलचालन करण्यासाठी आहे. आता उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी. त्यांचे या गोष्टीला समर्थन आहे का? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिल्याने आताचे वाईट दिवस त्यांच्यावर आले आहेत. एकामागून एक आमदार, नेते त्यांना सोडून जात आहे.
राष्ट्रवादीचा दावा….
दरम्यान, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, तानाजी सावंत, संजय राठोड व गुलाबराव पाटील यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाल्याशिवाय राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी आग्रही आहेत. विशेषतः अब्दुल सत्तारांविषयी केंद्रात प्रचंड नाराजी आहे.
यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत, असे राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. यावर शिंदे गटाने त्यांच्या पक्षात कोणाला ठेवावे, कोणाला मंत्रिपद द्यावे, हा त्यांचा विषय आहे. भाजप कधीही दुसऱ्या पक्षात ढवळाढवळ करत नाह, असे स्पष्टीकरण महाजन यांनी दिले.