सणबूर (वार्ताहर) – केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून साकारत असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असा नामविस्तार करण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करण्याचा निर्णय सह्याद्री व्याघ्र राखीव संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये झाला असल्याची माहिती गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यातील सह्याद्री व्याघ्र राखीव संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची सन 2020-21 ची सभा व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे नुकतीच पार पडली.
बैठकीत ना. शंभूराज देसाई, नागपूर येथून नियामक मंडळाचे अध्यक्ष वनमंत्री ना. संजय राठोड, आ. आशिष जैसवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) सुरेश गैरोला, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकुडकर, मुंबई येथून प्रधानसचिव वने मनुकुमार श्रीवास्तव, अप्पर प्रधान वनसंरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये, वनसंरक्षक तथा वनक्षेत्रपाल सत्यजित गुजर, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, उपसंचालक महादेव मोहिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) सुरेश साळुंखे सहभागी झाले होते.