मुज्जफरनगर – केंद्र सरकारने तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले हा सरकारचा निर्णय स्वागतार्ह असला तरी त्यांनी आता शेतकरी नेत्यांशी एमएसपीला कायद्याचे स्वरूप देण्याच्या मागणीवर चर्चा सुरू केली पाहिजे अशी मागणी भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी केली आहे.
भारतीय किसान युनियनच्या सिसौली येथील मुख्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकरी आंदोलन कधी मागे घेणार असे विचारता ते म्हणाले की संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत त्यावर निर्णय घेतला जाईल.
शेतकऱ्यांनी संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेवर ट्रॅक्टर मोर्चा आयोजित केला होता पण सरकारच्या विधायक भुमिकेला प्रतिसाद देण्यासाठी आम्ही हा मोर्चा रद्द केला आहे. किमान हमी भावाचे कायद्याने संरक्षण मिळणे ही आमची मुख्य मागणी आहे त्यावर सरकारने निर्णय घेतला पाहिजे असा आता आमचा आग्रह आहे. त्या विषयी सरकार शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी बोलण्यास तयार नाही ही खेदाची बाब आहे असेही त्यांनी म्हटले आहे.