नवी दिल्ली – शेतकरी आंदोलन केवळ पंजाब आणि हरियाणापुरते मर्यादित असल्याचे मोदी सरकार म्हणते. मात्र, देशव्यापी रेल रोकोमुळे आमचे आंदोलन मर्यादित नसल्याचे सिद्ध झाले, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेत्यांनी दिली.
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाची तीव्रता वाढवण्याच्या उद्देशातून शेतकरी संघटनांनी गुरूवारी रेल रोको आंदोलन केले. त्याला देशभरात अनेक ठिकाणी प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल शेतकरी नेत्यांनी समाधान व्यक्त केले.
रेल रोकोमध्ये अनेक राज्यांमधील शेतकरी सहभागी झाले. रेल्वेचे जाळे देशभर पसरले आहे. तसेच स्वरूप आमच्या आंदोलनाचेही आहे. आंदोलन मर्यादित असल्याचे सरकारचे म्हणणे रेल रोकोने खोटे ठरवले, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी मांडली. पंजाब, हरियाणाबरोबरच महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि इतर काही राज्यांतील शेतकरी रेल रोकोमध्ये सहभागी झाल्याचे दिसले. त्या आंदोलनाचा भाग म्हणून शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी रेल्वे मार्गांवर धरणे धरले.
चार तासांच्या रेल रोकोमुळे काही रेल्वे मार्गांवरील सेवा विस्कळीत झाली. मात्र, त्या आंदोलनाचा रेल्वेसेवांवर अत्यल्प परिणाम झाल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला. आंदोलनादरम्यान कुठली अनुचित घटना घडली नसल्याचेही रेल्वेकडून सांगण्यात आले.