ज्येष्ठांना आता पुढचा प्रवासासाठी मोजावे लागणार जादा पैसे
पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ज्येष्ठ नागरिकांना सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक आहे. यंदा महामंडळाने प्रवासादरम्यान सवलत घेण्यासाठी वर्षभरात चार हजार किलोमीटरची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता 4 हजार कि.मीच्या पुढचा प्रवास सवलतीत करता येणार नसून अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
प्रवासादरम्यान सवलत घेताना स्मार्ट कार्डची मुदत तीन महिन्यांनी वाढवून मार्च महिन्यापर्यंत करण्यात आली आहे. यापूर्वी एसटीतून प्रवास करताना सवलतीकरिता किलोमीटरचे बंधन नव्हते. मात्र 1 एप्रिलपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक केल्याने किलोमीटरचेही बंधन येणार आहे. आता एका वर्षात फक्त 4 हजार किलोमीटर प्रवासासाठीच सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, ज्येष्ठ नागरिकांना आता 4 हजार किलोमीटरच्या पुढचा प्रवास सवलतीत करता येणार नसून अधिकचे पैसे देऊन तो करावा लागणार आहे. एसटीच्या नव्या स्मार्ट कार्ड अंमलबजावणीनंतर हा निर्णय राज्यभरात लागू होणार आहे.
प्रवाशांची संख्या घटण्याची शक्यता
महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकांना साध्या, निमआराम बसमध्ये 50 टक्के, शिवशाहीमध्ये 45 आणि शिवशाही स्लीपरमध्ये 30 टक्के सवलत दिली जाते. सवलतीच्या प्रवासामुळे ज्येष्ठ नागरिकांचाही ओढा एसटीकडे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, 4 हजार किलोमीटरच्या प्रवासाच्या मर्यादीत धोरणांमुळे प्रवासी संख्या घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रवासी सवलतीचा मिळणारा परतावा उत्पन्न सुद्धा कमी होणार असल्याने एकंदरीत एसटीची प्रवासी संख्या आणि उत्पन्नावर परिणाम होणार आहे.
10 लाखांहून अधिक ज्येष्ठांना भुर्दंड
राज्यभरातून 17 हजार एसटी बसेसमधून दररोज सुमारे 67 लाख प्रवासी विविध ठिकाणी प्रवास करतात. त्यापैकी 65 वर्षांवरील ज्येष्ठांची संख्या सुमारे 10 लाखांच्या घरात असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आता सवलतीसाठी 4 हजार किलोमीटरपर्यंत मर्यादा असल्याने त्यानंतर प्रवास करण्यासाठी 10 लाखांहून अधिक ज्येष्ठांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
एसटीने प्रवास करताना ज्येष्ठांना सवलत देण्याची नैतिक जबाबदारी सरकारची आहे. यामुळे ही सवलत कोणत्याही अटी-शर्ती न घालता केवळ वयाची माहिती घेऊन द्यावी. तसेच सवलतीसाठी कोणत्याही किलोमीटरची मर्यादा न ठेवता सवलत द्यावी.
-मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक)
एसटीने प्रवास करताना सवलतीसाठी किलोमीटरची मर्यादा नव्हती. मात्र, आता वर्षभर चार हजार कि.मी.ची मर्यादा ठेवण्यात आल्याने त्यानंतर प्रवास करताना पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे महामंडळाने ज्येष्ठांना प्रवासाची मर्यादा वाढविण्याची आवश्यकता आहे.
-शांताराम जगताप, ज्येष्ठ नागरिक