पुणे – पानशेत, वरसगाव आणि टेमघर या तीन धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणामध्ये पाण्याचा येवा वाढला आहे. त्यामुळे या तीनही धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पानशेत धरणातून 1 हजार 283 क्युसेक, वरसगावमधून 600 क्युसेक आणि टेमघरमधून 350 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
खडकवासला प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो, त्यामुळे या धरणांतील पाणीसाठ्याकडे सर्वांचे लक्ष असते. सध्यस्थितीत प्रकल्पातील चार धरणांत मिळून एकूण पाणीसाठा 94 टक्के म्हणजे 27.41 टीएमसी इतका आहे. मागील काही दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली होती.
मात्र, काल रात्रीपासून धरण परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे पाणीपातळीत वाढ होत आहे. परिणामी पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.