विविध पतमानांकन संस्थांकडून विकासदर अंदाजात घट
नवी दिल्लीे – भारत सरकारने गेल्या आठवड्यात पहिल्या तिमाहीचा विकासदर उणे 23.9 टक्के होणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, आगामी काळात परिस्थिती वेगाने सुधारेल असे सांगण्यात आले आहे. आता काही पतमानांकन संस्थांनी भारताचा चालू आर्थिक वर्षाचा विकासदर उणे 14.8 टक्क्यांपर्यंत कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
फिट्च या जागतिक पतमानांकन संस्थेने या वर्षी भारताचा विकासदर उणे 5 टक्के होण्याची शक्यता याअगोदर वर्तविली होती. मात्र नंतर बदललेल्या परिस्थितीच्या आधारावर या संस्थेने भारताचा विकासदर उणे 10.5 टक्के होणार असल्याचे म्हटले आहे. इतर देशांच्या विकासदराच्या तुलनेत भारताचा विकासदर जास्त कमी होणार असल्याचे या संस्थेने जारी केलेल्या आकडेवारीतून दिसून येते.
या संस्थेने म्हटले आहे की, अमेरिकेचा विकासदर उणे 4.6 टक्के होणार आहे. तर चीनचा विकासदर 2.7 टक्के राहणार आहे. इतर देशांचे विकासदरही भारताच्या तुलनेत बरे असणार असल्याचे दिसून येते. दरम्यान, इंडिया रेटिंग संस्थेने यावर्षी भारताचा विकासदर उणे 11.8 टक्के होईल असे म्हटले आहे.
काही महिन्यांपूर्वी भारताचा विकासदर जगात सर्वात जास्त होता. मात्र, मनुष्यहानी टाळण्यासाठी भारत सरकारने देशभर दीर्घकाळ लॉकडाऊन केले. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे चक्र बराच काळ ठप्प झाले. त्यामुळे भारत विकासदराच्या बाबतीत मागे फेकला गेला आहे. आता तो लवकरात लवकर वाढावा याकरिता सरकार प्रयत्न करीत असले तरी एक वर्षभर तरी परिस्थिती सुधारणार नसल्याचे पतमानांकन संस्थांना वाटते. गोल्ड मॅन सॅक्स संस्थेने विकासदर उणे 14.8 टक्के होईल असे म्हटले आहे.
भारत सरकार आशावादी
असे असले तरी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने परवा जाहीर केलेल्या आकडेवारीनंतर अर्थमंत्रालयाने परिस्थिती अतिशय वेगाने सुधारणार असल्याचा दावा केलेला आहे. ज्या वेगाने भारताचा विकासदर कोसळला त्याच वेगाने तो उंचावेल असे अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, करोनावरील लस येण्यास आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो आणि दरम्यानच्या काळामध्ये भारतामध्ये रुग्णांची संख्या वाढणार आहे. यामुळे भारतीय मनुष्यबळाच्या सक्रियतेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.