मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातून महायुतीने आगामी लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. त्यानंतर कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी नुकताच शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर दक्षिण लोकसभा मतदारसंघावरुन भाजपच्या नाराजीच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. दक्षिण मुंबई प्रमाणेच इतर जागांवरूनही महायुतीत अंतर्गत धुसफूस सुरू आहे. राज्यातील काही लोकसभा मतदारसंघावर तिन्ही पक्षांकडून दावा करण्यात येत आहे. अशीच काहीशी परिस्थिती महाविकास आघाडीत देखील पाहायला मिळत आहे.
माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून काढता पाय घेत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करत थेट दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत दिले. मिलिंद देवरांच्या याच भूमिकेमुळे आता शिंदे गट आणि भाजप यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या मतदारसंघातून भाजप आमदार मिलिंद देवरा आणि मंगलप्रभात लोढा आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
या मतदारसंघासाठी रस्सीखेच
1) रत्नागिरी-सिंधुदुर्ग – शिंदे गटाचे किरण सामंत लढण्यास इच्छुक तर भाजपकडून रविंद्र चव्हाण यांनी तयारी करण्याचे आदेश आपल्या समर्थकांना दिले आहेत.
2) रायगड – अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध करताना धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी.
3) शिरुर – अजित पवार यांनी मतदारसंघावर दावा केला, परंतु शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करत आपली दावेदारी सांगितली आहे.
4) मावळ – शिंदे गटाच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल असा पक्षाकडून दावा करण्यात आला असला तरी अजित पवार गटाचे सुनील शेळके आणि अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादीला जागा सोडण्याची अजित पवारांकडे मागणी केली आहे.
5) सातारा – अजित पवारांनी जागा लढणार असे म्हटले असले तरी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपणच निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
६) अहमदनगर – भाजपचे सुजय विखे निवडणूक लढणार अशी चर्चा असताना निलेश लंके यांची राम शिंदे यांच्यासोबतची वाढती जवळीक विखे कुटुंबासाठी डोके दुखी ठऱण्याची शक्यता आहे. कारण लंके स्वतः लोकसभेसाठी तयारीत आहेत.
७) छत्रपती संभाजीनगर – लोकसभा युतीच्या जुन्या जागा फॉर्मुल्यानुसार शिवसेनेकडे येते. मात्र गेल्या वर्षभरापासून भाजपचे भागवत कराड हे तयारी करत आहेत. शिवसेनेकडून देखील संदिपान भुमरे यांच्यासह अन्य नेते इच्छुक आहेत. त्यामुळे या जागेवरून देखील रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.