जम्मू एअर बेसवरील ड्रोन हल्ला भारतातील जिहादी युद्धाचा आयाम संपूर्णपणे बदलून गेला. आगामी काळातील राष्ट्रीय सुरक्षेच्या आयामात ड्रोन्सचे महत्त्व वाढतच जाणार आहे, त्याची ही चुणूक होती. जिहादी स्लीपर सेल्सनी भारतात लहान, कमी पल्ल्यांच्या ड्रोन्सचा वापर अंतर्गत दहशतवादासाठी करायचे ठरवले तर त्याचे अतिशय गंभीर परिणाम होऊ शकतात. धोका ओळखून आधीच उपाय करणे हे सामरिक दूरदृष्टीचे लक्षण मानले जाते.26 जून आणि 27 जूनच्या रात्रीच्या दहा मिनिटांमध्ये भारतातील जिहादी युद्धाचा आयाम संपूर्णपणे बदलून गेला. त्या रात्री जम्मूच्या एअर बेसवर दोन बॉम्ब हल्ले झाले. माध्यमांमधील माहितीनुसार, त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. एअरफोर्सचे दोन एअरमेन जुजबी जखमी झाले. पहिल्या बॉम्बमुळे येथील एका इमारतीच्या स्लॅबला साधारणतः दीड दोन फूट व्यासाचे भोक पडले आणि त्याच्या हादऱ्यांमुळे खालच्या खोलीतील दरवाजे आणि सामानाला थोडी फार हानी पोहोचली.
दुसरा बॉम्ब तेथून थोड्या अंतरावर जमिनीवर पडून तेथे खोल खड्डा पडला. हा बॉम्ब पडण्याच्या जागेपासून केवळ 35-40 मीटर अंतरावर बेसमधील हेलिकॉप्टर हॅंगर्स होते. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये या इलाक्यात एक पाच- सहा किलो वजनाचे आयईडी सापडले आहेत. झालेली हानी पाहता स्फोट झालेले बॉम्बदेखील त्याच वजनाचे असावेत, असा अंदाज आहे.
हे स्फोट का व कसे झाले, यामध्ये टीएनटी, आरडीएक्स किंवा प्लॅस्टिक यापैकी कोणत्या एक्स्प्लोझिव्हचा वापर झाला, या घटनेमागे कोण होते, हल्ला करणाऱ्यांचा उद्देश काय, हल्ला ड्रोनद्वारे सीमापारच्या पाकिस्तानी भूमीवरून झाला की स्थानिक जिहाद्यांनी स्फोटके वापरून केला, जर ड्रोन असतील तर संख्या किती, एवढ्या महत्त्वाच्या बेसवर कोणालाही न कळत हल्ला झालाच कसा, हे इंटेलिजन्स फेल्युअर होते का, याला एअर बेसनी काय व कसा रिस्पॉन्स दिला, अशा अनेक प्रश्नांवर पुढील काही दिवस उलटसुलट चर्चा होत राहील.
या हल्ल्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध नसली तरी उपलब्ध माहितीच्या आधारे या हल्ल्यांमधून अनेक सामरिक निष्कर्ष काढता येतात. भारतीय एअरबेसवर किंवा कॅन्टोन्मेंटवर झालेला पहिल्या ड्रोन हल्ल्यामुळे ही जिहाद्यांनी अंगिकारलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या सामरिक समन्वयाची निशाणी आहे. संरक्षण विश्लेषकांच्या भूमिकेतून या हल्ल्याची मीमांसा केल्यास काही गोष्टी उजागर होतात.
मागील काही दिवसांपासून पाकिस्तानी आयएसआय आणि तेथील खलिस्तान्यांनी पंजाब व राजस्थानमध्ये हेक्झाकॉप्टर ड्रोन्सद्वारे एके-47 रायफल्स, पिस्तुले व मोठ्या प्रमाणात स्फोटके पाठवलीत. यामुळे भारत पाक सीमेवर चोरटी आयात आणि जिहाद्यांच्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या काटेरी कुंपण संकल्पनेचा फज्जा उडाला. यातून ड्रोन्सद्वारे होणाऱ्या हवाई घुसखोरी स्वरूपी आतंकवादाचा ओनामा झाला आहे आणि तीच गहन चिंतेची बाब आहे.
जम्मू एअर बेसवर झालेल्या हल्ल्यातील ड्रोन एकतर सीमापारहून आले असतील किंवा जिहाद्यांच्या स्लीपर सेलनी जम्मूमधूनच लॉंच केले असतील. ड्रोन सीमापारहून आले असतील तर त्यांची रेंज लक्षात घेता ते जम्मूपासून 14-15 किलोमीटरवर असलेल्या आरएसपुरा मार्गेच आले असणार. पाकिस्तानपाशी एकूण 15-20 किलो स्फोटके असलेले दोन ते चार हलक्या वजनाच्या आयईडी बसवता येणारे लहान व स्वस्त चिनी ड्रोन्स मोठ्या संख्येत आहेत.
टार्गेट साइटवर फक्त दोनच स्फोट झाले होते आणि एक शाबूत आयईडी मिळाली आहे. त्यामुळे एकच ड्रोन आले असावे आणि त्याने तीन आयडी डिस्चार्ज केले असावेत; तिसऱ्याचा स्फोट न झाल्यामुळे ते चौथ्या आयईडीला घेऊन परत गेले असेल, असा निष्कर्ष काढता येतो. मग प्रश्न येतो की त्यांना सीमेच्या आतील आणि सीमेवरील रडार्सनी का पकडले नाही. तसेच मधल्या भूभागामध्ये तैनात असलेल्या सेंट्रींना या ड्रोनचा आवाज का ऐकू आला नाही?
कदाचित ड्रोन्सनी जमिनीपासून पंधरा ते वीस फूट उंचीवर नाल्यांच्या कंटूर्समधून उड्डाण केले असण्याची शक्यता आहे. जर ड्रोन जम्मूमधूनच लॉन्च केले गेले असतील तर आपल्या लॉंच साइटपासून ते इमारतींना चुकवत टार्गेटपर्यंत कसे आले आणि परत कसे गेले हाही प्रश्न उभा राहतो. त्यासाठी जिहाद्यांनी जमिनीचे अत्यंत सूक्ष्म तपशील असणाऱ्या गुगल मॅपचा उपयोग केला असण्याची शक्यता आहे. या दोन्ही पर्यायांमध्ये आपल्या येथील लोकांनी हल्लाकर्त्यांना सर्वंकष, सक्रिय मदत केली असेल, यात शंकाच नाही.
इमारतीच्या छताला पडलेल्या भगदाडावरून हे प्रत्ययाला येतं की, हल्ला ड्रोनद्वारेच झाला आहे. रात्रीच्या मिट्ट काळ्या अंधारात अचूक उड्डाण करणाऱ्या ड्रोनला, मानवीय पद्धतीने कंट्रोल करणे अशक्यप्राय असते. अशा प्रकारच्या अचूक हल्ल्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आवश्यक असते आणि ते या हल्ल्यात पाहायला मिळाले.
एयर डिफेन्स कव्हर आणि रडार डिटेक्शनमधून निसटण्यासाठी जमिनीपासून 50-100 फुटांच्या उंचीवरून ड्रोन्सना इतक्या लांब उड्डाण करवण्याच्या कठीण व किचकट कारवाईसाठी प्रचंड मिलिटरी इंटलिजन्स अँड एक्सपर्टिझची आवश्यकता असते. पण भारतीय रडार सिस्टीमचा डोळा चुकवून ड्रोननी जो विध्वंस केला त्यावरून लो लेव्हल फ्लाइंग करणाऱ्या संसाधनांचा शोध घेण्यासाठी लावलेल्या भारतीय रडार्सची जागा चुकीची असावी, असे म्हणता येईल.
जगात 12-15 किलोमीटर्सचा पल्ला, जीपीएस, व्हर्टिकल टेकऑफ आणि लॅंडिंग कॅपेबिलिटी असणारी स्वस्त चिनी क्वाडकॉप्टस, हेक्झाकॉप्टर्स, मिनी हेलिकॉप्टर ड्रोन्स मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. ही संसाधने फोटोग्राफिक टूल्सच्या गोंडस नावाखाली विकली जात असली तरी त्यांच्याकडून दहशतवादी हल्ला केला जाऊ शकतो.
अशी संसाधने दीड ते साडेचार लाख रुपयांपर्यंत मिळतात. यांची कमी किंमत व सोप्या तंत्रज्ञानामुळे लहान हवाई हल्ल्यात त्याचा वापर सहज सुलभ असतो. शिवाय, हल्ला करणारा अनामिक राहातो. लहान ड्रोन्समध्ये वायरलेस कंट्रोल सिस्टीम असल्यामुळे 15 चौरस किलोमीटर क्षेत्रात ह्या ड्रोन्सना कुठूनही कार्यरत करता येते. यांची गती 20 मीटर्स प्रति सेकंद इतकी असते. आकार छोटा पण ऑपरेटिंग एरिया मोठा असल्यामुळे त्यांच्या ऑपरेटरला किंवा यांना शोधणे फार कठीण असत. भारतात आजमितीला सर्व प्रकारचे 80 हजारहून अधिक ड्रोन्स उड्डाण करताहेत.
सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीने डिसेंबर 2018 मध्ये सर्व ड्रोन्सनी स्वतःला रजिस्टर करून युनिक आयडेन्टिफिकेशन नंबर घेणे बंधनकारक केले होते. तसेच ड्रोन्सनी विमानतळ किंवा एकूणच संवेदनशील ठिकाणांजवळ न येता मंत्रालयाच्या “नो परमिशन नो टेकऑफ’च्या आदेशाचे पालन करण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र, दहशतवादी कधीच रजिस्टर्ड ड्रोन्सचा वापर करणार नाहीत.
अशा पुंड ड्रोन्सना शोधण्यासाठी आपल्याला, इस्रायलसारखी आयर्न डोम एयर डिफेन्स सिस्टीम आणि रेडियो फ्रिक्वेन्सी स्कॅनर टेक्नॉलॉजी यांचा वापर करावा लागेल. काउंटर अनमॅन्ड एरियल सिस्टीमच्या साह्याने अशा ड्रोन्सना शोधून त्यांचा पाठलाग करून त्यांना नष्ट करण्याच्या क्षमतेचा त्वरित अंगीकार करणे ही भारताची आता गरज बनली आहे.
ड्रोन्सना शोधणे आणि त्यांचा पाठलाग ही पारंपरिक रडार्सच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. कारण ते वेगाने उड्डाण करणाऱ्या धातूंनी बनलेल्या विमानांना शोधू शकतात. ड्रोन हे लहान आकार व फायबर ग्लासचे असल्यामुळे रडारवर एखाद्या सूक्ष्म टिंबासारखे दिसतात आणि रडार ऑपरेटरच्या नजरेतून निसटतात. ड्रोन्सना शोधण्यासाठी अत्युच्च फ्रिक्वेन्सी रडार्सची आवश्यकता असते. याबाबत शासनाला प्राधान्याने विचार करावा लागेल.
भविष्यात स्फोटकांनी भरलेले ड्रोन एखाद्या गर्दीच्या ठिकाणी येऊन आदळले तर मोठी जीवितहानी होऊ शकते. ती रोखणे हे आजघडीला तरी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, वायुसेना, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन अँड सिक्युरिटी, संरक्षण व गृहखात्यासमोरील फार मोठे आव्हान आहे. यासाठी, काउंटर अनमॅन्ड एरियल सिस्टीमची त्वरित निर्मिती करून आणि ऑफ द शेल्फ विकत घेऊन त्यांच्या चाचण्यांचे आयोजन करावे लागेल.
त्याचबरोबर संवेदनशील ठिकाणांचा आढावा घेऊन ड्रोन्स हल्ला झाल्यास सुरक्षादलांची जबाबदारी, कार्यपद्धती आणि रडार्स, अँटी एअरक्राफ्ट गन्स, एअर डिफेन्सची संरचना कशी करायची यांची स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स बनवावी लागतील. ड्रोन्सना शोधणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे यासाठी केवळ 90 सेकंदांचा वेळ असतो, हे लक्षात घ्यायला हवे.
स्मॉल ड्रोन्स हे घरी बनवता येतात. ते खुल्या बाजारातही उपलब्ध असल्यामुळे त्यांचा सर्वदूर वापर होतो आहे. जिहादी स्मॉल ड्रोन्स बनवून किंवा विकत घेऊन त्यांच्यात हवे असणारे, गरजेपुरते परिवर्तन किंवा मर्यादित बदल अगदी सहज करू शकतात. या ड्रोनवर लावलेल्या आयईडीत कुठलंही स्फोटक वापरलं तरी ते विध्वंस करेलच. जरी फॉरेन्सिक रिपोर्ट आले नसले तरी स्फोटकांचे कण मिळायला ज्या अडचणी आल्यात त्यानुसार जम्मू एअर बेसवरील हल्ल्यात प्लॅस्टिक एक्स्प्लोझिव्हचा वापर झाला असण्याची शक्यता मोठी आहे.
जम्मू एअर बेसवर करण्यात आलेले बॉम्बिंग, स्फोट, अति घातक नसला तरी त्यामुळे आपल्यावर मनोवैज्ञानिक आणि तणाव पडेल यात शंकाच नाही. लघु आकारामुळे ड्रोन्स भविष्यात, सेनेवर हावी होतील. त्यामुळे अँटी आणि काउंटर ड्रोन टूल्स तयार करण्याला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. स्मॉल ड्रोन्स क्षेत्रातील जिहादी कुरघोडी आपल्यासाठी सामरिकदृष्ट्या हानीकारक असेल.
जिहादी फिजिकल स्ट्राइक करोत किंवा ड्रोनद्वारे, त्यांना सफल होण्यासाठी पुरवठ्यासाठी मानवी व संसाधनीय नेटवर्कची आवश्यकता असतेच. दुर्दैवाने असे नेटवर्क भारतात कोळ्याच्या जाळ्यासारखे “व्हास्ट बट अनसीन’रित्या पसरले आहे. पोलीस अथवा सुरक्षा दले संशयितांना ताब्यात घेतात; पण कोर्टात केस कुशल वकिलाच्या साह्याने ते संशयित सहज सुटतात. जिहाद्यांच्या बाबतीत हे प्रकर्षाने जाणवते. ही न्यायप्रणालीमधील त्रुटी आहे की, सरकारची हतबलता हे अगम्य आहे.
जोपर्यंत कायद्यातील त्रुटी दूर होत नाहीत तोपर्यंत जिहादी वरचष्मा कायम राहील. जिहादी स्लीपर सेल्सनी भारतात लहान, कमी पल्ल्यांच्या ड्रोन्सचा वापर अंतर्गत दहशतवादासाठी करायचे ठरवले तर त्याचे अतिशय गंभीर परिणाम होऊ शकतात. चीनच्या डेल्टा विंग छोट्या ड्रोन्सच्या साह्याने जिहादी मोठ्या शहरांमधील महत्त्वाच्या संसाधनांवर हल्ला करून हैदोस माजवू शकतात आणि हाच भावी ड्रोन युद्ध संकल्पनेचा गाभा असणार आहे.
नजिकच्या भविष्यात भारतीय उपखंडातील ड्रोन्स प्रत्यक्ष हवाई हल्ल्यांचे स्थान घेतील. ड्रोन्सची उपयुक्तता छद्म युद्धात निःसंशयपणे वाढतच जाणार आहे. या नव्या प्रकारच्या युद्धाला तोंड देण्यासाठी स्वतःला सज्ज करण्याशिवाय पर्यायच नाही. आगामी काळातील राष्ट्रीय सुरक्षेच्या आयामात ड्रोन्सचे महत्त्व वाढतच जाणार आहे. जम्मू एअर बेसवरील ड्रोन हल्ला ही त्याची चुणूक होती. धोका ओळखून आधीच उपाय करणे हे सामरिक दूरदृष्टीचे लक्षण मानले जाते. तहान लागल्यावर विहीर खोदणे अर्थहीन असते, हे आर्य चाणक्यांचे वचन सदैव ध्यानात ठेवणे यातच शहाणपण आहे.
– कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)