आळंदी -संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा 190 वा पालखी प्रस्थान सोहळा शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी साडेसहा वाजता “माऊली माऊली’च्या जयघोषात आणि मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित पार पडला.
करोनाच्या पार्श्वभूमीवर माऊलींच्या चल पादुका आजोळ घरी बंदिस्तात ठेवण्यात आल्या आहेत. तर आळंदीत कोणी येऊ नये, म्हणून पोलिसांचा 24 तास खडा पहारा कायम असल्याने आळंदी सुनीसुनी आहे.
सलग दुसऱ्या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी पायी वारी आळंदी ते पंढरपूर रद्द करण्यात आली आहे; मात्र माऊलींच्या चल पादुका प्रस्थान झाल्यानंतर तब्बल 17 दिवस आजोळ घरी मुक्कामी ठेवण्यात आल्या आहेत. रविवार (दि. 18) पर्यंत या पादुका आजोळघरी बंदिस्तात मुक्कामी राहणार असल्याचे देवस्थानचे प्रमुख विश्वस्त माऊली वीर यांनी सांगितले.
तर सोमवारी (दि. 19) माऊलींच्या चल पादुका सुगंधी आकर्षक अशा फुलांनी सजविलेल्या लालपरी (राज्यपरिवहन महामंडळ) तून मानकऱ्यांच्या उपस्थित दोन बसेसमधून किमान 100 जणांना घेऊन हरिनामाचा गजर करीत पंढरीकडे प्रस्थान ठेवतील, असेही देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.
या कालावधीत नियमित पादुकांना पवमान अभिषेक दुग्धाभिषेक नैवेद्य आणि इतर नित्याचे धार्मिक कार्यक्रम हे गांधी कुटुंबीयांच्या वतीने करण्यात येणार आहेत. या ठिकाणी कोणालाही दर्शनासाठी अथवा मुखदर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही.
त्यासाठी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने फेसबुक ऍप तयार केला असून भाविकांनी या ऍपवर मनोभावे माऊलींच्या पादुकांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच बंदोबस्त शिथील केल्यानंतर आळंदीकर ग्रामस्थ, भाविकांनी पादुकांचे स्पर्श दर्शन घेण्याचा प्रयत्न करू नये किंवा आग्रह धरू नये, असे आवाहन आळंदी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पादुकांचीही प्रतिकात्मक महापूजा
आळंदी वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिरात माऊलींचे पादुकांची प्रतिकात्मक महापूजा दही, दूध, मधाचा अभिषेक, महापूजा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ऍड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर यांच्या हस्ते करण्यात आली.त्यानंतर आरती, महाप्रसादाचा महानैवेद्य दाखविण्यात आला.