मुंबई – राज्यात करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भाजपाने महाविकास आघाडीविरोधात महाराष्ट्र बचाओ आंदोलन सुरू केले आहे. त्यासाठी ‘माझे अंगण, माझे रणांगण’ म्हणत भाजपाचे नेते घरच्या घरी आंदोलन करून सरकारचा निषेध करत आहेत. यावर काँग्रेसने घणाघाती टीका केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक कविता शेअर करत भाजपावर टीका केली आहे. करोनासारख्या भयानक संकटात भाजपाला राजकारण कसं सुचतंय, करोना हा सर्व मानवजातीसाठी भयंकर शत्रू ठरत आहे. अशा परिस्थितीत जीवाची बाजी लावून कोरोनाविरोधात लढणारे डॉक्टर, नर्स, पोलीस आणि प्रशासन यांचे मनोधैर्य न वाढवता युद्धजन्य परिस्थितीतही भाजपाने निषेधाचा सूर लावला आहे. मरो जनता, हवी सत्ता अशी भाजपाची अवस्था झाली आहे, अशी टीका या कवितेतून करण्यात आली आहे.
कोरोनाच्या भयानक संकटात
सुचतं कसं राजकारण?
काळे कपडे घालून म्हणती
अंगणाचे करू रणांगण
शत्रू कोरोना समस्त मानवतेचा
भयंकर अन् मायावी
डॉक्टर,नर्स,पोलिस,प्रशासन
जीवाची बाजी लावी
वाढवती न धैर्य योद्ध्यांचे
समरातही निषेधाचे सूर जयांचे
मरो जनता हवी सत्ता#महाराष्ट्रद्रोहीBJP नाव तयांचे— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 22, 2020
दरम्यान, ‘माझे अंगण, माझे रणांगण’ आंदोलनात भाजपच्या नेत्यांनी राज्यभरात आपआपल्या घराच्या अंगणात, कार्यालयाबाहेर काळ्या फिती बांधून, ठाकरे सरकारविरोधातील घोषणांचे फलक हातात घेऊन उभे राहिले आहेत.