मुंबई : नवी मुंबईच्या खारघरमध्ये काल ज्येष्ठ निरुपणकारआप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला लाखो श्रीसेवक आले होते. मात्र उष्माघातामुळे 12 श्रीसेवकांचा मृत्यू झाला असून अन्य काही श्रीसेवकांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेवरून राजकीय वर्तुळातुन संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.
ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. मी त्याबद्दल सरकारचं अभिनंदन केलं. मात्र या पुरस्कार सोहळ्यात आलेल्या लाखो लोकांपैकी ११ लोकांचा उष्माघाताने बळी गेला. ही घटना सरकारला टाळता आली नसती का? असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला खडे बोल सुनावले आहेत. काही वेळापूर्वीच ट्वीट करत राज ठाकरेंनी सरकारला हे सगळं सुनावले आहे.
काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते…
— Raj Thackeray (@RajThackeray) April 17, 2023
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला.
पुढे आपल्या ट्विटमध्ये त्यांनी,’सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी. ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.” असे म्हटले आहे.