मुंबई – रविवारच्या सुट्टीनंतर आज हिवाळी अधिवेशनाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. आज उद्दाहव ठाकरेंनी स्वतः विधान परिषदेत हजेरी लावत महराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी अनेक सवाल उपस्थित केले. ज्यावेळी तुम्ही आमच्यासोबत होता तेव्हा सीमाभागासाठी लाठ्या काठ्या खाल्ल्या आता तिकडं गेलात म्हणून गप्प बसायचं नाही अशी टोजेबाजी देखील यावेळी उद्धव ठाकरेंनी केली. ठाकरेंच्या या टोलेबाजीला प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिल.
सीमावाद प्रकरणी एकनाथ शिंदे यांनी ४० दिवसांचा तुरुंगवास भोगला त्यामुळे या वादावर बोलण्याचा अधिकार फक्त शिंदेंना आहे. सीमावादावर शिंदे-भाजप सरकारच्याच काळात निर्णय होईल असं दरेकर यावेळी म्हणाले. आमच्या मनात आणि नसानसात सीमावासियांच्या प्रति प्रेम आहे. ही कोणाची मक्तेदारी नाही,कोणाच्या पक्षाचा विषय नाही हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. सीमाप्रश्नी तुम्ही लाठ्या-काठ्या खाल्ल्या का?, असा सवाल देखील प्रवीण दरेकरांनी यावेळी उद्धव ठाकरेंना विचारला.
याआधी तिन्हही ठिकाणी काँग्रेसची सरकार होती त्यावेळी हा प्रश्न का सुटला नाही. याचा जाब कधी विचारलात का. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्याच काळात सीमावासियांचे चांगले होईल असा विश्वास देखील यावेळी दरेकर यांनी व्यक्त केला. अशा चर्चेवेळी तरी टोमणे मारू नये,एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नी लाठ्या काठ्या खाल्ल्या जेलमध्ये गेले,आपण कधी लाठ्या काठ्या खाल्ल्या,कधी जेलमध्ये गेलात ? लाठ्या काठ्या खाणार आम्ही सगळे आणि हे केवळ बोलणार आणि भाषण करणार असंही दरेकर यावेळी म्हणाले.