कोरेगाव -कोरेगाव तालुक्यातील बर्गेवाडीनजीक धोम डावा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले असून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाने कालव्याच्या दुरुस्तीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे कालवा फुटला असून शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धोम डावा कालव्यातून सध्या रब्बी हंगामासाठी तिसरे रोटेशन दि. 23 रोजी सोडण्यात आले होते. आज तिसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता 48 हजार 500 मीटर अंतरावर बर्गेवाडीमधून आसगावकडे जाणाऱ्या ओघळीवरुन जाणारा कालवा फुटला. कालव्याला मधोमध मोठा खड्डा पडल्याने काठोकाठ भरून चाललेल्या कालव्यातील पाणी मोठ्या प्रमाणात खालून वाहणाऱ्या ओघळीमध्ये घुसले. ते पुढे ओघळीच्या आजबाजूचा परिसर व्यापत पुढे आसगावच्या दिशेने पुढे गेले. पाण्याचा प्रवाह मोठा होता. त्यामुळे प्रवाहाबरोबर ओघळीचा दोन्ही बाजूचा भराव वाहून गेला. ओघळीच्या आजूबाजूला अनेक विहिरी आहेत. या सर्व विहिरींमध्ये हे गाळयुक्त पाणी घुसल्याने विहिरी तुडुंब भरून वाहू लागल्या.
विहिरीमध्ये बसवलेल्या मोटारी, इंजिन्स पाण्याखाली गेल्या. विहिरीच्या चारी बाजूला टाकलेला मुरूम, दगड, मातीचा भराव वाहून गेला. बर्गेवाडी ते आसगाव वाहणाऱ्या ओघळ परिसरातील श्रीमंत पांडुरंग जाधव, सुनील शिवाजी दुर्गुले, दिलीप कृष्णा कदम, बाबुराव परशुराम कदम, शंकर विठोबा जाधव, बाळासाहेब नारायण राजमाने, श्रीमंत पांडुरंग जाधव, शंकर नानासो जाधव यांच्यासह वीस पंचवीस शेतकऱ्याच्या विहिरीत पाणी घुसून नुकसान झाले. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने पाणी बाजूच्या शेतामध्ये घुसले. श्रीमंत पांडुरंग जाधव यांच्या उसाच्या उभ्या पिकात पाणी घुसल्याने शेतातील काळवट माती मोठ्या प्रमाणत वाहून गेली. त्यामुळे उसाचे नुकसान झाले. शेतीच्या कडेने टाकलेली ताल वाहून गेली.
तालीसाठी वीस ते पंचवीस ट्रक माती आणि दगड टाकले होते. ते देखील वाहून गेले. शेजारी असणाऱ्या भाऊसो फाळके यांच्या मोकळ्या शेतातील काळी माती वाहून गेली. ओघळीला लागून असलेल्या बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसले. त्यामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाले. खेड- बर्गेवाडी या पानंद रस्त्यावरील गणेश मंदिराजवळ असणारा साकव पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे पाणी पुलावरून वाहून आसपासच्या परिसरात घुसले. कालवा फुटल्याचे समजल्यानंतर सातारारोड येथील धोम पाटबंधारे शाखेचे शाखाधिकारी पी. बी. पिसाळ, कालवा निरीक्षक ए. पी. वाघमले यांनी घटनास्थळी भेट दिली. कालवा फुटला थेटून वरील 37 दारे उघडून पाण्याचा प्रवाह कमी करण्याचा प्रयत्न केला. धोम धरणापासून कॅनॉल बंद केला.
सर्व फाटे ओपन केले. त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी होण्यास मदत मिळाली. दरम्यान, येथील शेतकऱ्यांनी सांगितले की, या कालव्यातून अगोदरपासून पाण्याची गळती सुरु होती. याबाबत अनेक वेळा जलसंपदा विभागाच्या अधिकारी, पाटकऱ्यांना कल्पना दिली होती. त्यांनी तात्पुरती डागडुजी केली. त्यामध्ये कालवा दुरुस्ती व्यवस्थित झाली नाही. त्यामुळे ही घटना घडली.
दुरूस्ती करून रोटेशन सुरु करण्याची मागणी
रब्बीतील गहू, हरभरा ही पिके भरण्यासाठी हे रोटेशन सुरु केले होते. चंचली गावानजीक गेल्या पंधरा दिवसापूर्वी या कालव्याला असाच खड्डा पडला होता. त्याची डागडुजी केल्याने हे रोटेशन दहा दिवस उशिरा सुरु झाले. आज तिसऱ्या दिवशी कालवा फुटल्याने पुन्हा हे रोटेशन बंद करण्याची वेळ आली. फुटलेल्या कालव्याची तत्काळ दुरुस्ती करून रोटेशन पूर्ववत न केल्यास शेतकऱ्याचे नुकसान वाढणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने तातडीने दुरुस्ती करून रोटेशन सुरु करावे, अशी मागणी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष सी. आर. बर्गे, कार्याध्यक्ष रणजित फाळके, संघटक पृथ्वीराज बर्गे यांनी केली आहे.