पुणे – ढोलताशा महासंघाकडे नोंदणीकृत असलेल्या पथकांना महासंघाने आचारसंहिता घालून दिली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्या पथकांना पुढील वर्षी नोंदणी देण्याबाबत विचार केला जाईल, असे ढोलताशा महासंघाने सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, संजय सातपुते, विलास शिगवण, ऍड. शिरीष थिटे, ओंकार कलढोणकर, संजय शिगवण आदी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. ढोलताशा पथकांमुळेच मिरवणुकीला उशीर होतो, तसेच उत्सवाआधी चाळीस दिवसांपासून नदीपात्रात, कॅनॉलच्या शेजारी ढोलवादनाचा सराव केला जात आहे. यामुळे तेथे राहणाऱ्या नागरिकांना त्रास होत असल्याचा दावा काही लोकांकडून करण्यात आला होता. त्याविषयी ठाकूर यांनी नाराजीही व्यक्त केली.
विसर्जन मिरवणुकीचा विलंब टाळण्यासाठी ढोलताशा पथकांकडून केवळ बेलबाग चौक, उंबऱ्या गणपती चौक आणि टिळक चौक या तीन चौकांतच जास्तीत जास्त आठ ते दहा मिनिटांपर्यंत वादन केले जाणार आहेत. उर्वरित चौकांतून ही पथके वादन करतानाच मार्गस्थ होणार आहेत, अशी ग्वाही ठाकूर यांनी दिली. उशीर झाल्यास महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून पथकांना पुढे जाण्याच्या सूचना केल्या जातील. गणेश मंडळे, प्रशासनासह महासंघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक समन्वय राखण्यासाठी सहकार्य करतील, असे ठाकूर यांनी नमूद केले.
पराग ठाकूर म्हणाले…
- पथकांमध्ये पन्नास ढोल, पंधरा ताशे आणि ध्वजपथकासह दीडशे ते दोनशे वादकांचा सहभाग.
- प्रत्येक वादकाच्या गळ्यात ओळखपत्र असेल. कोणतेही पथक टोलवादन करणार नाही, अशी आचारसंहिता पथकांना घालून दिली आहे.
- विसर्जन मिरवणूक वेळेत संपावी, यासाठी सर्व ढोलताशा आणि ध्वजपथकांकडून गणेश मंडळे आणि पोलिसांना सहकार्य केले जाईल.
- तीनच चौकांत जास्तीत जास्त आठ ते दहा मिनिटांपर्यंत वादनाचे खेळ
नागरिकांना त्रास होऊ नये
“ढोलताशा पथकांच्या सरावांसाठी आतापर्यंत परवानगी घेतली जात नव्हती. पोलीस प्रशासनासोबत संपर्क समन्वयातूनच सराव केला जात होता. यंदा प्रथमच सरावाच्या परवानगीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरावासाठी मोकळ्या जागा मिळत नसल्याने अडचणी येत आहेत, तरीही नागरिकांना त्रास होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी सरावाचा कालावधी दीड महिन्यापर्यंत कमी केला आहे,’ असे ठाकूर म्हणाले.