मुंबई : मुंबईत शिवसेना ( ठाकरे गट ) आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आता ‘मस्टर मंत्री’च राहणार की काय? ते फक्त कोण आला, याची नोंद ठेवणार? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. या त्यांच्या टीकेला आता भाजपकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक ट्वीट करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. या ट्विटमध्ये “देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं,” असे म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
त्यासोबतच पुढे बोलताना, “ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, भाजपामध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे. राम मंदिराचं भूमीपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारनं राज्यभर गुन्हे दाखल केले होते, हे तुम्ही विसरलात की काय?” असा थेट सवाल चंद्रशेखवर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
“तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती. जी प्रामाणिक शिवसैनिकानं मुक्त केली आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने महाराष्ट्रावर फडकला. नरेंद्र मोदीजींवर टीका करण्याची तुमची लायकी नाही हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे आणि देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं,” असे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे.
ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते @uddhavthackeray म्हणत आहेत की, भाजपमध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे.
राम मंदिराचं भूमीपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 7, 2023
त्यासोबतच “औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलं आहे. हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला. तसाच सुरूंग जनतेनं तुमच्या सत्तेला लावला. २०२४ सालीही सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिलंय,” अशी टीका बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
दरम्यान, मेळाव्यात “सरकारमध्ये किती उपमुख्यमंत्री नेमणार आहात? म्हणजे आधी एक पक्ष चोरला, नंतर दुसरा पक्ष चोरला. आता कुणीतर सांगत होतं, काँग्रेसही फोडणार आहेत. त्यामुळे राज्यात किती उपमुख्यमंत्री होणार आहेत? आणि देवेंद्र फडणवीस फक्त ‘मस्टर मंत्री’ राहणार की काय? ते फक्त वही घेऊन कोण आला? याची नोंद ठेवणार का?” अशी टोलेबाजी उद्धव ठाकरे यांनी केली होती. याच टोलेबाजीला आज भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.