मुंबई – भाजप नेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे खरे जनक असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केला. फडणवीस यांनीच सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार केला, असे ते म्हणाले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहे. यातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बावनकुळे यांनी विरोधकांवर आरोप केले आहेत.
२०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आमचे सरकार पाडले नसते, तर भाजप सत्तेत आली नसती आणि मराठा आरक्षण देण्याचा प्रश्न तेव्हाच सुटला असता असे विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कधीही विचार केला नाही. तो विचार सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांनी केला.
तसेच, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कायदा केला. पण, या नतद्रष्टांनी मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल आहे, हे मांडण्याची पद्धत चुकवली. जेव्हा हे प्रकरण अंतिम टप्प्यात होते, तेव्हा हे नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री झोपले होते का? असा सवालही बावनकुळे यांनी केला.
शिंदे-फडणवीस सरकार आरक्षणासाठी प्रयत्नशील
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे. तसेच, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाले आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.