मुंबई – राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांनी 2 जुलैला शिंदे-फडणवीस सरकार महायुतीत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या दिवशीपासूनच अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सातत्याने विविध नेते याबाबत वक्तव्य करत असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याबाबत भाष्य केलं आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत,अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांसह माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील अजित पवार मुख्यमंत्री होतील असं विधान केलं होत. पृथ्वीराज चव्हाण यांनी तर अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याची तारीख देखील जाहीर केली होती. अशात देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच राहतील असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या शक्यतेवर भाष्य केलं. दुसरं कोणीही मुख्यमंत्री होणार नाही.इतर कोणी त्याबाबत पतंग उडवू नये त्यांचे पतंग कटतील असा टोला देखील यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर भाष्य करणाऱ्या विरोधकांना लगावला. तसेच महायुतीचा मुख्यमंत्री बदलणार नाही झालाच तर विस्तार होईल असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्या बाबत वक्तव्य केले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही निवडणूक लढणार नाही, कारण ठाण्याबाहेर त्यांचा फारसा प्रभाव दिसत नाही. आता भाजपकडे अजित पवारांचा पर्याय आहे त्यांना मुख्यमंत्री केलं जाईल, अशी भविष्यवाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. येत्या 10 ऑगस्ट दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतरबद्दल निर्णय होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री हे अजित पवार होतील. त्यांना ती जबाबदारी आगामी लोकसभा निवडणुक पाहता दिली होईल, असेही चव्हाण म्हणाले.