मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे. यात त्यांनी ‘उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतील करु इच्छितो. त्यामुळे आपल्याला जबाबदारीतून मुक्त करावे, असे म्हटले आहे. त्यांच्या या राजीनाम्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी याविषयी बोलताना,“गेल्या तीन-चार महिन्यांपासून राज्यपाल खासगीत सांगत आहे, मला परत जायचं आहे. माझी तब्येतही साथ देत नाही आहे. हे सरकार यायच्या आधीपासून राज्यपाल परत जायचं म्हणत आहेत. राज्यपालांना कोणीही राजीनामा देण्यास सांगितलं नाही. राज्यपाल ५ वर्षे राहू शकतात, कोणीही त्यांना राजीनामा मागितला नाही. पण, राज्यपालांनी स्वत: पंतप्रधानांना सांगितलं आहे, यापुढे काम करण्यास इच्छूक नाही. मला परत गेलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही मला राजीनामा देण्याची परवानगी द्यावी,” असे म्हटले आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र न लिहता राष्ट्रपतींना लिहायला हवं होतं, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावरही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “राजीनामा दिल्यावर राष्ट्रपतींनाच कळवणार आहे. राज्यपालांना पायउतार व्हायचं तेव्हा चर्चा करुन ते निर्णय घेणार. कारण, राष्ट्रपती राज्यपालांची नियुक्ती चर्चा करुनच करतात. त्याची प्रक्रिया म्हणजे पंतप्रधानांना पत्र लिहणं आहे. तसेच, राज्यपाल हे व्यक्ती असून, पंतप्रधानांचा सल्ला घेणं गैर नाही आहे. महाविकास आघाडीच्या सत्तेत स्वयराचार करायचा होता, तो राज्यपालांनी करु दिला नाही. त्यामुळे राज्यपालांना लक्ष्य करण्यात आलं,” असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.