नवी दिल्ली – महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला आरक्षणच द्यायचे नाहीये. त्यामुळेच त्यांच्याकडून वेळकाढूपणा केला जात आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर केली आहे.
देवेंद्र फडणवीस दिल्लीत आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून हल्ला चढवला. ठाकरे सरकारला आरक्षणच द्यायचेच नाहीये. त्यामुळे त्यांनी 50 टक्के मर्यादेचे नवे कारण शोधले आहे. इंदिरा सहानी केसमध्ये अतिशय स्पष्टपणे यावर भाष्य केले आहे. सध्या मुद्दा आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा नाही. तर मुद्दा मागास घोषित करण्याचा आहे.
एखाद्या समाजाला मागास घोषित केल्यानंतर किती टक्के आरक्षण द्यायचे हा नंतरचा भाग आहे. अजून मागासच घोषित केले नाही, मग आरक्षणाच्या मर्यादेचा प्रश्न येतो कुठे? असा सवाल करतानाच आतापर्यंत जातींना मागास ठरवण्याचा अधिकार राज्याला नाही म्हणून केंद्राकडे बोट दाखवले जात होते. आता राज्यांना अधिकार मिळतोय. त्यामुळे सरकारने कारवाई करावी, असे ते म्हणाले. नवनवीन मुद्दे काढून सरकार वेळकाढूपणा करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.