मतदारांशी संवाद साधतांना दिलीप वळसे पाटील यांची ग्वाही
मंचर- वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन या गावाचा कायापालट केला आहे. या भागातील महत्त्वाचे व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी यापुढे देखील कटिबद्ध आहे, अशी ग्वाही विधानसभेचे माजी अध्यक्ष व महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
वळसे पाटील यांनी गावभेट दौऱ्यानिमित्त वडगाव काशिंबेग येथील स्थापना केलेल्या देवीचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी सुसंवाद साधला. नागरिकांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले. यावेळी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर करखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, बाळासाहेब बाणखेले, कुलस्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष शंकर पिंगळे, माऊली विष्णू डोके, माजी सरपंच बाळासाहेब पिंगळे, राष्ट्रवादीचे वडगाव काशिंबेगचे अध्यक्ष महेश डोके, माजी सरपंच श्रीराम डोके, शंकर डोके जगदीश पिंगळे राजेंद्र खिरड, विकास पिंगळे, लक्ष्मण डोके आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी सरपंच बाळासाहेब पिंगळे म्हणाले की, वळसे पाटील यांनी गेल्या 30 वर्षांत वडगाव काशिंबेगचा चांगला विकास तर केलाच आहे; परंतु आंबेगाव-शिरूर तालुक्याचा विकास करण्यामध्ये आपले खूप मोठे योगदान आहे. वडगाव काशिंबेग येथील अर्धपीठ गणपती तीर्थक्षेत्राला राज्यशासनाकडून तीर्थक्षेत्राचा “क’ दर्जा मिळवून देऊन या तीर्थक्षेत्राचा मोठा विकास केला आहे. तसेच कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, रस्ते, वीज व शैक्षणिक यांसारखे मूलभूत प्रश्न सोडविले आहे.
- सहकार्यअसेच राहू द्या…
आजपर्यंत तुम्ही गेली 30 वर्षे माझ्यावर भरभरून प्रेम केले. सहावेळा विधानसभेत पाठवून मला आपली सेवा करण्याची संधी दिली. आजपर्यंत आपल्या सहकार्याने विविध विकासकामांचा निधी आणून आपले प्रश्न सोडवले आहे व आपले प्रलंबित असणारे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा यावेळी मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन वळसे पाटील यांनी केले.