सततचा पाऊस अन् दलदलीमुळे विजेच्या कामाचा खोळंबा
कोल्हापूर (प्रतिनिधी) – ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नद्यांना आलेल्या महापुराचा विद्युत यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. पूर ओसरताच गावठाण व शहर हद्दीतील वीजपुरवठा महावितरण अधिकाऱ्यांनी काही तासात सुरु केल्याने जनजीवन सुरळीत होण्यास मोलाची मदत झाली. परंतु, गावठाणपेक्षा नदीकाठच्या वीज यंत्रणेला महापुराचा सर्वाधिक फटका बसल्याने अद्याप महावितरणची महापुराच्या संकटातून सुटका झालेली नाही. सततच्या पावसामुळे नदीकाठ व सखल भागातील दलदल कमी झाली, नसून विजेच्या साहित्याची व खांबाची वाहतूक करणे, उभारणी करणे अशा कामांचा खोळंबा होत आहे. पावसाने उघडीप दिल्यास अडचणींवर मात करुन दहा ते पंधरा दिवसांत वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रभावी नियोजन महावितरणने केले आहे.
महापुरामुळे महावितरणची कोल्हापूर जिल्ह्यातील २६ वीज उपकेंद्रे बाधित झाली. परिणामी ३ लाख ३८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. त्यातील ३ लाख २३ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर ओसरताच सुरू करण्यात आला. मात्र, परतीच्या पावसामुळे परिस्थिती सामान्य होण्यास बराच अवधी लागला. आजही नदीकाठच्या १४०६ रोहित्रांचा व त्यावरील १४ हजार ४४८ शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद आहे. तेथील शेतीही पाण्यात गेल्याने पिके कुजली आहेत. त्यांचेकडून वीजपुरवठ्याची मागणी होत नाही. तर ज्यांची शेती नदीपासून दूर आहे व मोटारी नदीकाठावर आहेत. अशा शेतकऱ्यांकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे. पावसाची उघडीप राहिल्यास १५ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत केला जाणार आहे.
मात्र वारंवार कमी-जादा प्रमाणात येणाऱ्या पावसामुळे कामात अडथळे येतच आहेत. अनेक ठिकाणी नदीकाठ खचला आहे. तेथील रोहित्र, खांब कोसळले आहेत. काही ठिकाणी ते वाहून गेले आहेत. तर बहुतांश ठिकाणी महापुरात वाहून आलेल्या झाडा-झुडपांमुळे वीज तारांना ताण बसून खांब वाकले आहेत. तारा तुटलेल्या आहेत. पूर आल्यापासून आजतागायत महावितरणची यंत्रणा या आस्मानी संकटाचा सामना करत आहे. शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरणचे कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत. त्यात वारंवार पडणाऱ्या पावसामुळे कामे करण्यास मर्यादा येत आहेत. शेतकरी बांधवांनीही परिस्थिती समजून घेऊन वीज यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.