पुणे – मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला विभागातील आडत्यांनी बाजार समितीच्या आदेशाकडे दूर्लक्ष केले आहे. 750 पैकी केवळ 18 आडत्यांनी बाजार समितीकडे 500 रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यामुळे आडते आणि बाजार समिती प्रशासनात यावरून वाद होण्याची चिन्हे आहेत. मंगळवारपासून (दि. 1 ऑगस्ट) प्रतिज्ञापत्र न देणाऱ्या डमींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. खरेच कारवाई होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
फळ, भाजीपाला विभागात डमी आडत्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे दूबार विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीमालाला कमी भाव मिळत आहे. या परिस्थिती नवनिर्वाचित संचालक मंडळ ऍक्शन मोडमध्ये आहे, त्यांनी सुरूवातीला बाजाराची विक्रीची वेळ निश्चित केली. त्यानंतर दोनच डमी असल्याचे लिहून देण्याच्या सूचना गाळाधारकाला दिल्या आहेत. मात्र, सुरूवातीला त्यास आडत्यांनी विरोध केला होता. बाजार समितीने ठरवून दिलेल्या वेळेत एकाही आडत्याने प्रतिज्ञापत्र दिले नव्हते.
त्यानंतर बाजार समितीकडून आडत्यांवर कारवाई करण्यात येणार होती. मात्र, त्यानंतर आडते असोसिएशनच्या सुचनेनुसार 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. दुसऱ्यांदा दिलेल्या वेळेतही आडत्यांनी प्रतिज्ञापत्र दिलेले नाही.
दुसऱ्यांदा मुदतवाढ दिलेल्या 31 जुलैपर्यंत 18 आडत्यांनी प्रतिज्ञापत्र जमा केले आहे. मंगळवारपासून (दि. 1 ऑगस्ट) प्रतिज्ञापत्र न दिलेल्या डमींवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्याकडील शेतीमाल कारवाई करून जप्त केला जाणार आहे. तसेच, आडत्यांकडून उद्याही प्रतिज्ञापत्र स्विकारण्यात येणार आहेत. – महेंद्र काळभोर, विभागप्रमुख, फळे-भाजीपाला, पुणे बाजार समिती, पुणे
शेतकऱ्यांचे हित महत्त्वाचे…
कृषि उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासकीय राज जाऊन कारभार आता समितीच्या हाती आला आहे, अशावेळी केवळ शेतकरी हिताचे निर्णय घेतले जावेत, अशी अपेक्षा संबंधीत घटकांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.