मुंबई, दि. 21 – परमवीरसिंह यांच्या पत्राचे व संबंधीत प्रकरणाचे भांडवल करून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे, पण तो प्रयत्न यशस्वी होणार नाही असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
परमीवरसिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांना शंभर कोटी रूपये वसुलीचे टार्गेट दिले होते असा आरोप केला आहे. त्या संबंधात पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन पवारांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली.
ते म्हणाले की परमीवरसिंह यांनी पत्रात केलेले आरोप गंभीर आहेत त्याची सखोल चौकशी केली पाहिजे.तथापि त्यांच्यावरील कारवाईच्या संबंधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील. त्या संबंधात गृहमंत्र्यांचीही बाजू ऐकून घेतली पाहिजे. सर्वांशी चर्चा करूनच या संबंधात आज-उद्यापर्यंत निर्णय होईल असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना पोलिस दलात परत घेण्याचा निर्णय परमवीरसिंह यांनीच घेतला होता ही बाबही पवार यांनी स्पष्ट केली. वाझे यांच्या फेरनियुक्तीमध्ये मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा संबंध नव्हता असेही पवार यांनी यावेळी नमूद केले. पवार म्हणाले की परमीवीरसिंह यांच्या पत्राच्या संबंधात माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे.
या प्रकरणात माजी ज्येष्ठ पोलिस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी केली जावी अशी सुचना मी त्यांना करेन असेही पवार म्हणाले. परमवीरसिंह यांनी त्यांची बदली झाल्यानंतर त्यांनी गृहमंत्र्यावर आरोप केले आहेत असेही त्यांनी पत्रकारांच्या लक्षात आणून दिले.
या साऱ्या प्रकरणाचे भांडवल करून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे पण त्यांच्या या प्रयत्नांत यश येणार नाही असा दावाही पवारांनी केला. फडणवीस दिल्लीला येऊन गेल्यानंतर परमीवरसिंह यांच्या पत्राचे प्रकरण समोर आले असल्याचेही पवारांनी यावेळी निदर्शनाला आणून दिले.