कांथी दक्षिण, दि. 21 – सुवेंदु अधिकारी यांच्या कुटुंबियांचा खरा चेहरा मी ओळखू शकले नाही ही माझीच चूक आहे, त्यावेळी मी मोठा गाढवपणा केला असे तृणमुल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्या आज पुर्व मेदिनापुर जिल्ह्यातील एका निवडणूक प्रचार सभेत बोलत होत्या. अधिकारी यांच्या कुटुंबाने पाच हजार कोटी रूपयांची माया गोळा केल्याची अफवाही मी ऐकली आहे असा दावाही त्यांनी केला.
आपण जर पुन्हा सत्तेवर आलो तर त्यांच्या या मायाजालाची चौकशी केली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. अधिकारी यांच्यासह त्यांच्या बंधुंनी भाजप मध्ये प्रवेश केला असून त्यांची वडिल व तृणमुल कॉंग्रेसचे विद्यमान खासदार शिशिर अधिकारी यांनीही आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ममतांनी ही टीका केली आहे.
ममतांनी सुवेंदु अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांची तुलना मीर जाफर यांच्या ऐतिहासिक गद्दारीच्या प्रकरणाशी केली आहे. अशा गद्दारांना पश्चिम बंगालची जनता मतपेटीद्वारे धडा शिकवील असा दावाही त्यांनी केला आहे. मीर जाफर हे तत्कालिन बंगाल प्रांताचे नवाब सिराज उद्दौला यांचे लष्कर प्रमुख होते. त्यांनी प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौला यांच्याशी गद्दारी करून ब्रिटीशंना साथ दिली होती हा इतिहास आहे.
मी स्वताला या बाबतीत गाढव समजते त्यांना मी ओळखू शकले नाही. त्यांच्याकडे हजारो कोटी रूपयांची माया जमली आहे असे लोक म्हणतात, याच पैशाचा वापर करून ते तुमची मते खरेदी करतील पण तुम्ही त्यांना कदापिही मतदान करू नका असेही त्या म्हणाल्या.अधिकारी कुटुंबियांनी येथे मोठी जमीन खरेदी केली आहे. ते या जिल्ह्याचे जमीनदार आहेत.
सारा जिल्हा ते बळकाऊन बसले आहेत त्यामुळे ते मलाही या भागात सभा घेऊ देत नाहीत इतके ते शिरजोर झाले आहेत असा दावाही त्यांनी केला. या जिल्ह्यात झालेला सर्व विकास हा राज्य सरकारच्या पैशातून झालेला आहे, तो अधिकारी कुटुंबाच्या खर्चातून झालेला नाही असेही त्या म्हणाल्या. अधिकारी कुटुंबिय तृणमुल कॉंग्रेस मध्ये असताना अंधपणे मी त्यांना पाठिंबा दिला ही माझी मोठी चुक होती असे त्यांनी या आधीच्या सभेतही बोलताना सांगितले.