छत्रपती संभाजीनगर – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आळंदी येथे काल रविवारी वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत अनेक नेत्यांनी निषेध व्यक्त केला. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील घडलेल्या या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी पंढरपूरला जाण्याआधी नाक घासून वारकऱ्यांची माफी मागितली पाहिजे, असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हंटले आहे.
“हिंदुत्ववादी समजणारे हे दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, पण वारकाऱ्यांवर लाठीचार्ज झाला ही वाईट घटना आहे. एरवी कधीही बोलणारा तो तुषार भोसले कुठे आहे? सुषमा अंधारे यांच्या विरोधात आरडा ओरडा करतो आता कुठे आहे तो, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांनीही पंढरपूरला जाण्याच्या आधी माफी मागितली पाहिजे, नाक घासून वारकऱ्यांची माफी मागितली पाहिजे नाहीतर वारकरी संप्रदाय त्यांना सोडणार नाही,” असा इशारा यावेळी चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.
याशिवाय नाना पटोले, अजित पवार, रोहित पवार यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. नाना पटोले म्हणाले की, ’शेकडो वर्ष चालत आलेल्या या वारकरी परंपरेला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने गालबोट लावलं आहे. ज्या पद्धतीने भोळ्याभाबड्या वारकऱ्यांवर लाठीचार्ज करवण्यात आला. त्या घटनेचा मी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो.’ दरम्यान, या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अनेकांनी या घटनेवरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.