कोथरूड, दि.15 (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही दिवसापूर्वी पुण्यातील चांदणी चौक येथे मोठ्या ट्रॅफिकचा सामना करावा लागला. या घटनेनंतर येथील सध्याचा असलेला पूल पाडून नवीन पूल बांधण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. साक्षात मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर पूल पाडण्याच्या कामाला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. दि. 18 सप्टेंबरला हा पूल पाडण्यात येत आहे. याची तयारी देखील सुरू झाली आहे. बांधलेला पूल पाडण्याची ही अलिकडच्या काळातील दुसरी वेळ आहे. यापूर्वी पुणे विद्यापीठ रस्त्यावरील उड्डाणपूल देखील पाडण्यात आला होता. या दोन्ही घटनांमुळे पूल नागरिकांच्या सोयीसाठी की राजकीय दबावातून पाडले जातात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे-मुंबई नवीन महामार्गाची निर्मीती झाल्यानंतर पुणे शहरालगतच्या भागात नागरिकरण वेगाने झाले. याच कारणातून चांदणी चौक परिसरात कोथरूड आणि मुळशी भाग जोडण्यासाठी चांदणी चौकात 20 वर्षांपूर्वी पूल उभारण्यात आला. हा पूल उभारत असताना पुणे हे देशातील झपाट्याने वाढणारे महानगर होते. या महानगरातील वाहतुकीचे नियोजन करताना पुढील 50 किंवा 100 वर्षांचा विचार का करण्यात आला नाही? त्याचवेळी वाढत्या वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेत भूसंपादनासह अन्य प्रक्रिया केली गेली असती तर या प्रकल्पावर होणाऱ्या खर्चाचीही बचत झाली असती. आता, पुन्हा पूल पाडण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. तसेच नव्याने पूल उभारण्यासाठीही मोठा निधी खर्च होत आहे. अशा प्रकारच्या नियोजनशून्य कामामुळेच पुणेकरांच्या पैशाचा अपव्यय होत आला आहे.
चांदणी चौकातील वाहतुकीमध्ये मुख्यमंत्री अडकले आणि हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठ रोडवरील पुलावर अजित पवार आणि काही नगरसेवक अडकले आणि तो पूल पाडण्यात आला. या प्रकारच्या कामासाठी दीर्घकालीन नियोजन आवश्यक असते. याचा अभ्यास केला जात नाही का? नागरिकांसाठी दिर्घकालीन फायद्याचे प्रकल्प राबवित असताना भविष्यकालीन समस्यांचा तसेच तोट्याचा विचार करून प्रकल्प राबविले गेल्यास पुढील 100 वर्षे तरी अशा प्रकल्पांवर अन्य खर्च करावा लागणार नाही.