नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलेल्या दिलाशाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे रद्द झालेले लोकसभा सदस्यत्व पुन्हा त्वरीत बहाल केले जावे अशी मागणी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे करण्यात आली आहे.
लोकसभेतील कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी ही मागणी दाखल केली. त्यांनी म्हटले की, राहुल गांधींना त्यांच्या अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला दिलासा हा सत्याचा विजय आहे आणि त्यांचे सदस्यत्व बहाल करण्याची विनंती आम्ही सभापती ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे.
सत्ताधारी भाजपच्या षड्यंत्राचा एक भाग म्हणून गांधींना अपात्र ठरवण्यात आले आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिल्याने या प्रकरणात सत्त्याचाच विजय झाला आहे असे ते म्हणाले. राहुल गांधींनी लोकसभेत सरकारविरोधातील ‘अविश्वास प्रस्तावा’वर बोलावे, अशी आमची इच्छा आहे असे ते म्हणाले.
चौधरी म्हणाले की, आम्हाला भीती वाटते की राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात सरकारकडून काही अडथळे निर्माण होऊ शकतात. तथापि आम्ही सभापतींना या बाबतीत निर्णय घेताना विलंब न करण्याची मागणी आम्ही केली आहे असेही अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले.