नवी दिल्ली – भिलवाडा येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर तिला जाळल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. बलात्कारानंतर नराधमांनी अल्पवयीन मुलीचा मृतदेह कोळशाच्या भट्टीत पेटवून दिला आणि शरीराचा काही भाग जळण्यापासून शिल्लक असताना त्यांनी कृत्य लपवण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तलावात फेकून दिले.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा देताना, “दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर शुक्रवारी सकाळी तलावात अल्पवयीन मुलीचे शरीराचे अवयव सापडले. त्याचबरोबर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी 4 आरोपींना अटक केली आहे. याशिवाय आरोपीच्या कुटुंबातील चार महिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. राजस्थानमधील भिलवाडा येथे घडलेल्या प्रकरणामुळे देशभर खळबळ उडाली आहे.
प्रत्यक्षात बुधवारी जिल्ह्यातील कोत्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. सायंकाळपर्यंत मुलगी घरी न परतल्याने गावकऱ्यांसह कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, रात्री 10 वाजता पीडित मुलीच्या वडिलांना गावापासून 1 किलोमीटर अंतरावर शेतात कोळशाची भट्टी जळताना दिसली. संशयावरून तेथे पोहोचल्यावर त्या अल्पवयीन मुलीचे बूट तेथे सापडले. यावरून भट्टीवर उपस्थित असलेल्या आरोपींना विचारपूस केली असता त्यांनी निरपराधवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळण्यात आल्याचे सांगितले.
राखेमध्ये सापडली हाडे
आरोपीच्या सांगण्यावरून गुरुवारी सकाळी भट्टीची तपासणी करण्यात आली, त्यात चांदीची बांगडी व काही हाडे सापडली, मात्र या अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित होत होता. पोलिसांनी पहिल्याच दिवशी 4 आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्यांनी मुलीच्या मृतदेहाचा अर्धा जळालेला भाग एक किलोमीटर अंतरावरील तलावात फेकून दिल्याचे उघड झाले. पोलिसांनी चौकशीनंतर आरोपीची आई, पत्नी आणि बहिणींना ताब्यात घेतले आहे. तर मुख्य आरोपी कान्हा (21) आणि त्याचा भाऊ कालू (25) , संजय (20) रा. शाहपुरा पलसा आणि पप्पू (35), फुलिया काला यालाही अटक करण्यात आली आहे.