सातारा – जिल्ह्यात मटणाचे दर स्थिर ठेवा, अशी आग्रही मागणी सातारकरांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार अमोल भुसे यांनी ते स्वीकारले. काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मटणाच्या वाढत्या दरांविरोधात आंदोलन केले होते.
त्यानंतर तेथे मटणाचे कमाल दर निश्चित करण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर आता सातारा जिल्ह्यातील नागरिकांनीही मटणाचे दर नियंत्रणाखाली ठेवायची मागणी केली आहे. याबाबत निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात सध्या बोकड, शेळी, मेंढी यांच्या मटणाचे दर गगनाला भिडले आहेत. जिल्ह्यात व सातारा शहरात विविध ठिकाणी 550 ते 650 रुपये किलो दराने मटण विकले जात आहे. या दरांवर प्रशासनाचे नियंत्रण नाही.
त्यामुळे ग्राहक व विक्रेते यांच्यात विनाकारण वाद होत आहेत. मटणाचे दर सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे नसल्याने हे दर निश्चित करण्यासाठी प्रशासकीय समिती स्थापन करावी. विक्रेते व ग्राहक यांच्यात समन्वय साधून शहर व ग्रामीण भागात मटणाचे दर निश्चित करावेत, जेणेकरून सामान्यांच्या खिशाला तश परवडतील. यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष सागर भोगावकर, जयदीप ठुसे, शिवाजी जाधव, निवृत्ती शिंदे, विशाल कोळी, विजयकुमार धोतमल, मंगेश महामुलकर, सोमनाथ पवार उपस्थित होते.
कोल्हापूर पॅटर्न साताऱ्यात राबवा
कोल्हापूर जिल्ह्यात मटणाचा दर 480 रुपये किलो निश्चित करण्यात आला आहे. तोच पॅटर्न सातारा जिल्ह्यात राबवावा. सर्वसामान्य माणसाला सरासरी सहा ते सात हजार रुपये पगार मिळतो. त्यामुळे 600 रुपये किलोने मटण खरेदी करणे त्याच्या आवाक्याबाहेर आहे. कष्टकरी कुटुंबाला एका वेळी एक किलो मटण लागते. 600 रुपये किलो प्रमाणे महिन्यातून चार वेळा मटण खरेदी केल्यास 2400 रुपये खर्च होतो. प्रशासनाने मटणाचे दर निश्चित करावेत, अशी प्रतिक्रिया काही जणांनी व्यक्त केली.