दिल्ली – ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताला पहिलं वैयक्तिक पदक जिंकून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळवून देण्याच्या महाराष्ट्राच्या लढ्याला यंदा यश येण्याची चिन्हं दिसत आहेत. खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजीत जाधव आणि पैलवान संग्राम कांबळे हे सध्या दिल्ली मुक्कामी आहेत. खाशाबांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा म्हणून सुरु असलेल्या पाठपुराव्याला केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी पाठबळ दिल्याचं रणजीत जाधव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.
पै. जाधव आणि कांबळे यांनी रिजिजू यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. खाशाबा जाधव यांनी 1952 सालच्या ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या कांस्यपदकावर रिजिजू यांनी आदरानं आपला माथा टेकवला. त्यांनी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी दूरध्वनीवरून बातचीत करून खाशाबांचा प्रस्ताव लावून धरण्याची सूचना केली. तसंच खाशाबांसाठी पंतप्रधान कार्यालयाशी बोलण्याचं आश्वासन रिजिजू यांनी रणजीत जाधव यांना दिलं आहे.
This is the Olympic Bronze medal won by Khashaba Dadasaheb Jadhav at the 1952 Olympics in Helsinki, the first individual Olympic medal for Independent India. The other medal is his 6th position consolation medal from 1948 London Olympics.
Happy to meet his son Ranjit Jadhav. pic.twitter.com/ZXiyp9fvOv
— Kiren Rijiju (@KirenRijiju) December 23, 2021
दरम्यान, ऑलम्पिक मध्ये भारताला पहिले मेडल मिळवून देणारे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी दिल्ली येथे खासदार अमोल कोल्हे यांची ही पै. संग्राम कांबळे व रणजीत जाधव यांनी भेट घेतली. खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार दिला जावा या मागणीसाठी गेली काही वर्ष मोहीम सुरू आहे, परंतु केंद्र सरकारच्या अनास्थेमुळे या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. राज्य सरकार या पुरस्कारासाठी शिफारस करत आहे मात्र या शिफारशी कडे ही दुर्लक्ष करून प्रत्येक वेळी यादीतून नाव वगळले जात असल्याची जाणीव या वेळी खा. कोल्हे यांना करून देण्यात आली.
यावेळी कोल्हे यांनी हिवाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनात बोलण्याची संधी मिळाल्यास याबाबत नक्कीच प्रश्न उपस्थित करुन आवाज उठवू असे आश्वासन दिले.