सातारा – सातारा जिल्ह्यात करोनाच्या लॉकडाऊनमुळे मंडप व केटरिंग व्यवसाय पूर्ण ठप्प झाला आहे. त्यामुळे तब्बल तीस हजार कुटुंबे अडचणीत आहेत. कर्जाच्या हप्त्यांसाठी बॅंकांचा तगादा सुरू असल्याने मंडप व्यावसायिकांची कोंडी झाली आहे. या व्यवसायाला अनुदान मिळण्यासाठी उद्योगाचा दर्जा देण्यात यावा, या मागणीचे निवेदन मंडप असोसिएशनचे अध्यक्ष राम हादगे व केटरर्स असोसिएशनचे भरत वैष्णव यांनी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व जिल्हा प्रशासनाला दिले आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, करोनाच्या संकटात व्यावसायिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. बॅंकांकडून घेतलेल्या कर्जांचे हप्ते भरणे व्यावसायिकांना शक्य नाही. शासकीय नियमांचे पालन करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी. दरम्यान, मंत्री देसाई यांनी या व्यवसायांसंबंधी माहिती घेतली. जिल्ह्यात 30 हजार व्यावसायिक, सुमारे दीड लाख कामगार आणि त्यांची कुटुंबे अवलंबून असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
त्यानंतर हा प्रश्न विधिमंडळात मांडण्याचे आश्वासन देसाई यांनी दिले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील मंडप व केटरर्स असोसिएशनच्यावतीने पालकमंत्र्यांना याबाबतचे निवेदन देण्यात यावे. राज्य असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन द्यावे, असेही देसाई यांनी सुचविले.