पुसेगाव -पिकांच्या 40 ते 100 टक्क्यांपर्यंतच्या नुकसानीस कारणीभूत ठरणाऱ्या हुमणी किडीच्या बहुतांश अवस्था जमिनीखाली होतात. पिकांवर रासायनिक फवारण्यांसाठी होणारा खर्च व पिकांचे नुकसान टाळण्यासाठी मान्सूनपूर्व सांघिक पद्धतीने प्रकाश सापळे लावून हुमणीचे नियंत्रण करता येऊ शकते, अशी माहिती कृषी सहायक संतोष नेवसे यांनी केले.
नेर, ता. खटाव येथील शिवाजी पवार यांच्या शेतावर हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळे बसविण्याचे प्रात्यक्षिक नेवसे यांनी शेतकऱ्यांना दाखवले. ते म्हणाले, नदीकाठावरील हुमणी व माळरानावरील हुमणी अशा दोन प्रजाती आढळतात. माळावरील हुमणीमुळे जास्त नुकसान होते. या प्रजातीच्या नियंत्रणासाठी मे ते ऑगस्ट हा काळ महत्त्वाचा असतो. हुमणीच्या अंडी, अळी, कोष व भुंगेरा या अवस्था असतात. डिसेंबर-जानेवारीत सुप्त अवस्थेत भुंगेरे कोष बनून उन्हाळ्यात जमिनीत राहतात.
मान्सूनपूर्व पाऊस व ढगाळ वातावरणात सायंकाळी सात ते नऊ या वेळेत भुंगेरे बाहेर पडतात. नर-मादीचे मिलन होऊन मादी जमिनीत 60 अंडी घालते. एकरी दहा हजारांच्या पुढे अळ्या असतील तर पिकाचे 40 ते 100 टक्के नुकसान होते. या हुमणीच्या नियंत्रणासाठी चार ते पाच एकर क्षेत्रासाठी एक प्रकाश सापळा सायंकाळी सांघिक पद्धतीने लावावा. मोठा टब किंवा प्लस्टिकच्या कागदात पाणी साठवून त्यात रॉकेल किंवा डिझेल टाकावे चार-पाच फूट उंचीवर लाईटचा बल्ब सोडावा. हुमणीचे भुंगेरे प्रकाशाकडे आकर्षित होऊन रॉकेलमिश्रीत पाण्यात पडून मरतात. अशा प्रकारे संभाव्य नुकसान बिनखर्चात कमी करता येते.
उपविभागीय कृषी अधिकारी महेश झेंडे, मनोज वेताळ, तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव, मंडल कृषी अधिकारी सचिन लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन व्यापक मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती कृषी सहाय्यक हरिदास भोसले यांनी दिली. यावेळी शंकर जगदाळे, सचिन पवार, दादा शिर्के, हनुमंत पवार व शेतकरी उपस्थित होते.