आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदी येथे माऊलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनार्थ नियमित हजारो भाविक राज्याच्या कानाकोपर्यातून येतात. याठिकाणी आल्यानंतर आपल्या पायातील चपला, बुट मंदिराच्या अगदी महाद्वारात असणार्या घंटेखाली व प्रथम पायरी श्री गुरु हेबतबाबांची त्याच्या शेजारी असणारे कासव यांचे दर्शन घेऊनच मंदिरात प्रवेश करावा लागतो. मात्र भाविक आपल्या पायातील पादत्राणे याठिकाणी सोडतात. त्यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच चपलांचा खच पडल्याचे ओंगळवाणे चित्र दिसत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनाकरिता आळंदीत दररोज हजारो भाविक येत असतात. तर माऊली मंदिरालगत आळंदी संस्थानच्या वतीने गणेश दरवाज्यानजीक एकमेव चप्पल स्टॅण्ड आहे. मात्र भाविकांची संख्या व याठिकाणी असलेली चप्पल ठेवण्याची व्यवस्था याचा ताळमेळ बसत नाही.
याशिवाय इंद्रायणी नदी व भराव रस्त्यावरून येणार्या भाविकांसाठी मुख्य प्रवेशद्वारालगत चपला ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे या बाजूने येणारे भाविक आपल्गया चपला थेट मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काढतात. त्यामुळे दररोज याठिकाणी चपलांचा खच दिसत आहे. त्यामुळे माऊलींच्या मंदिराचे पावित्र्य यामुळे नष्ट होत आहे. मंदिराच्या सर्वच प्रवेशद्वारानजीक चप्पल स्टॅण्ड उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.