मुंबई – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले. त्यांनी ठाकरे गटाकडून वारंवार होत असलेल्या टीकांचा खरपून समाचार घेतला. यानंतर विरीध पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी पवार यांनी शिंदेंना मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदाऱ्यांची आठवण करुन दिली. तसेच, शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात नुसत्या घोषणांचा पाऊस पाडून महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोपही अजित पवार यांनी केली. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा पाठही शिकवला. तसेच, छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्यरक्षक होते, असेही ठणकावून सांगितले.
आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही.’बाल शौर्य पुरस्कार’ हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी द्यावा.छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते,धर्मवीर नव्हते.त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही.#हिवाळीअधिवेशन२०२२ pic.twitter.com/PrG5icBJHZ
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 30, 2022
दरम्यान, अजित पवार यांच्या या विधानावरून आता राजकीय वातावरण तापले असून त्यांच्यावर टीका होत आहे. तर काहींनी विरोधीपक्ष नेतेपदाच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेने राजीना्म्याची मागणी केली आहे.
धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी म्हंटले आहे की, अजितदादा, तोंडात येईल ते बोलत राहायचं आणि समाजातील लोकांची माथी भडकवायची हे दिवस आता गेले. दादा यापूर्वी देखील आपण एक विधान केले होते व आपल्याला त्या विधानामुळे घरी बसावे लागले होते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आम्हाला असे वाटले की, यावरून आपण बोध घेतला असेल ? पुन्हा तीच वेळ येऊ द्यायची नसेल तर आपण ज्या जिल्ह्याचे नेतृत्व करता ती भूमी संतांची व शूरवीरांची आहे किमान बोलताना आपण तारतम्य बाळगल पाहिजे.
शिंदे फडणवीस सरकार समाजापुढे मांडत असणार विकासाचं, आरोग्याचं , शिक्षणाचं आणि शेतकऱ्यांच्या हिताचं हिंदुत्व तुमच्या पचनी पडत नाही. आम्हाला हे कोणी शिकवलं असेल, तर ते छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे पितृचरण महाराष्ट्रात आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज तोच विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. तातडीने माफी मागत आत्मकलेश करत वढू बुद्रुक येथे संभाजीमहाराज यांच्या समाधीस्थानावर जाऊन आपल्या पदाचा राजीनामा देत महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी भोसले यांनी केली आहे.