राजेगाव -खरीप हंगामासाठी दौंड तालुक्यात 16 हजार 914 मे. टन खत उपलब्ध झाले असून शेतकरी गटांनी आतापर्यंत 428 टन खते 923 शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी खतांची मागणी 17 हजार 392 मे. टन एवढी आहे तर आज अखेर खतांचा साठा 5491 मे. टन एवढा उपलब्ध आहे. 352 क्विंटल एवढी खरीप हंगामातील बियांची मागणी आहे. या हंगामातील 97 क्विंटल बियाणे शिल्लक असून शेतकऱ्याला कृषी विभागामार्फत बांधावर खते व बियाणे वाटप करण्यात येणार आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी आप्पासाहेब खाडे यांनी दिली.
शेतकऱ्यांना खते, बियाणे व कीटक नाशके उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी काम करत आहे. खरीप हंगामाच्या पेरणीच्या बियांसाठी शेतकरी कृषी केंद्रावर गर्दी करतील. सामाजिक अंतर पाळले जाणार नाही, त्यामुळे करोनोचा फैलाव होऊ शकतो. हे टाळण्यासाठी कृषी आयुक्तांनी आवश्यक सूचना केल्या आहेत. कृषी सेवा केंद्र शेतकरी गटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर बियाणे व खते वाटप केले जात आहे.
तालुक्यातील खते व बियाणांची दुकाने तपासणीसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. खरीप हंगामात शेतकरी बांधवांनी मागणी केलेल्या खतांचे व बियाण्यांचे वाटप करताना राजेगाव येथील शेतकरी नितीन फरगाडे यांच्या शेतात कृषी मंडळ अधिकारी महेश शिंदे, पंचायत समिती विस्तार अधिकारी नंदकुमार जरांडे, कृषी पर्यवेक्षक विजय जगताप, कृषी सहायक शरद काळे आदि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.