कोलकता – पश्चिम बंगालमधील हुगळीत रविवारी झालेल्या हिंसाचारानंतर ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. भाजप जाणीवपूर्वक राज्यातील अल्पसंख्याक भागात परवानगीशिवाय रॅली काढत असल्याचा आरोप त्यांनी सोमवारी केला. रविवारी हुगळी जिल्ह्यातील रिशरा आणि सेरामपूर येथे रामनवमीच्या मिरवणुकीत दोन गटांमध्ये हाणामारी झाली. येथे झालेल्या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी खेजुरी येथील ठाकूरनगर मैदानावर सार्वजनिक वितरण कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्या म्हणाल्या की, रामनवमीनंतर इतके दिवस मिरवणुका काढण्यात काय हेतू आहे? रामनवमीची मिरवणूक पाच दिवस का काढली जाणार? तो सण साजरा झाला त्या दिवसापर्यंत तुम्ही अशा अनेक रॅलीचे आयोजन करू शकता. यावर आमचा आक्षेप नाही, पण त्यासाठी शस्त्रे सोबत घेऊन जाणे योग्य नाही.
यादरम्यान भाजपवर आरोप करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपचे लोक जाणूनबुजून अल्पसंख्याक भागात मिरवणूक काढत आहेत. इतकंच नाही तर परवानगीशिवाय हे सर्व करत आहेत.
भाजप नेते दिलीप घोष म्हणाले की, मिरवणुकीत अनेक महिला आणि मुले होती ज्यांच्यावर हल्ला झाला. अचानक रस्त्याच्या एका बाजूने आमच्यावर दगडफेक झाली. दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले, पण मला आणि इतर काही नेत्यांना वाचवून बाहेर काढले. नंतर हल्लेखोरांना हुसकावून लावण्यात यश आले.
याआधी 30 मार्च रोजी पश्चिम बंगालमधील हावडा येथे रामनवमीनिमित्त शोभा यात्रेदरम्यान हिंसाचार उसळला होता. ज्यामध्ये दोन समुदाय आमनेसामने आले आणि जोरदार दगडफेक आणि जाळपोळ झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 मार्चलाही हावडा येथून हिंसाचार झाल्याच्या बातम्या आल्या. यादरम्यान हावडा येथील शिवपूरमध्ये दगडफेक झाली.