मुंबई – देशात गांधी कुटुंबिय आणि विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून मुद्दाम त्रास दिला जात आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राहुल गांधी हे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतील, असे भाकीतही त्यांनी व्यक्त केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले कि, काँग्रेस हा सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. स्वातंत्र्य चळवळीत पक्षाचे योगदान हे अत्यंत महत्वाचे आहे. त्या पक्षाचे अध्यक्षपद हे देशातील आणि राजकारणातील एक महत्वाचे पद आहे. गांधी कुटुंबाने देशाचे नेतृत्व करावे अशी जर जनतेची भावना असेल तर त्याचा सन्मान राखला पाहिजे. हीच खरी लोकशाही आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अपशब्दात टीका करणे चुकीचे आहे. ही आपली संस्कृती नाही, असा टोला राऊतांनी लागलेला आहे. तसेच, राहुल गांधी हे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाव्यतिरिक्त कोणी पक्षाचे नेतृत्व करेल का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, हा प्रश्न आपण भाजपाबद्दल विचारला तर आजही नरेंद्र मोदीच नेते आहेत. पक्षात लोकशाही असल्याचे सांगत असले तरी ती कोणाच्या नावावर चालत आहे हे सर्वांना माहिती आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र सामना अग्रलेखातून आज राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे. राहुल गांधी हे कमजोर नेते आहेत” असा प्रचार करूनही गांधी अद्याप उभेच आहेत व मिळेल त्या मार्गाने सरकारवर हल्ले करीत आहेत. माध्यमांच्या मानेवर सुरे टेकवून विरोधी पक्षाला कमजोर केले जाईल, पण विरोधी पक्ष हा कधीतरी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उभा राहील तेव्हा दाणादाण उडेल. देशाचा इतिहास हेच सांगतोय. राहुल गांधींचे भय हे दिल्लीतील सत्ताधाऱ्य़ांना वाटते. तसे नसते तर ऊठसूट गांधी परिवाराच्या बदनामीच्या शासकीय मोहिमा राबविल्या गेल्या नसत्या. लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते व हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जाते. राहुल गांधींचे भय त्या शंभर पटीतले आहे, असे शिवसेनेने अग्रलेखात म्हंटले आहे.