नवी दिल्ली – अभिनेत्री कंगना राणावत हिला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार त्वरीत काढून घ्यावा अशी मागणी करणारे निवेदन दिल्ली सरकारच्या महिला आयोगाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सादर केले आहे.
देशाला भीक म्हणून ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य देण्यात आले होते असे वादग्रस्त विधान कंगनाने अलिकडेच केले होते. त्यावरून देशभर तिच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला असून त्या प्रकरणी तिच्या विरोधात अनेक ठिकाणी पोलिस तक्रारीही सादर करण्यात आल्या आहेत.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मलिवाल यांनी राष्ट्रपतींना लिहीलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की कंगनाने देशातील तमाम स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान करणारे विधान केले आहे.
या प्रकरणात तिचा पद्मश्री पुरस्कार तर काढून घ्यावाच पण तिच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. लोकभावनांची कदर करून आपण या प्रकरणात त्वरीत कार्यवाही कराल अशी अपेक्षाही स्वाती मलिवाल यांनी केली आहे.