नवी दिल्ली – दिल्ली परिसरात यमुना नदी अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवर पोहचली असल्याने दिल्लीच्या प्रशासनाने अनेक ठिकाणी दक्षतेचे आदेश जारी केले आहेत. आज सकाळी अकरावाजता रेल्वेच्या जुन्या पुलानजिक यमुनेची पातळी 205.34 मीटरपर्यंत पोहचली होती. ती पातळी सतत पडणाऱ्या पावसामुळे आणखी वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात आल्याने दिल्ली प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा आदेश जारी केला आहे.
पूरनियंत्रण विभागाने विविध भागात तेरा मदत बोटी तैनात ठेवल्या आहेत. अन्य 21 बोटीही तैनातीसाठी सज्ज आहेत. हरियाणा राज्यातील हथनीकुंडातून जादा पाणी सतत सोडले जात असल्याने दिल्ली परिसरात यमुनेची पातळी वाढली आहे. दिल्लीच्या जिल्हा प्रशासनाकडून या स्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. हवामान खात्याने दिल्ली एनसीआर परिसरात पावसाच्या शक्यतेने ऑरेंज ऍलर्ट जारी केला आहे.
हथनीकुंडातून मंगळवारी दुपारी 1.60 लाख क्युसेक्स वेगाने पाणी सोडले गेले. अजूनही तेथून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. तेथून सोडलेले पाणी दिल्ली पर्यंत पोहचण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. हरियाणातून यमुनानगर कुंडातूनही 19056 क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात होते त्याचा वेग काल गुरुवारी 25839 इतका होता.
एक क्युसेक म्हणजे प्रति सेकंदाला 28.32 लाख लिटर पाणी असे या पाण्याचे प्रमाण असते. सन 1978 साली यमुनेच्या दिल्लीतील पाण्याची पातळी आत्तापर्यंतची सर्वोच्च पातळी ठरली होती. त्यावेळी युमनेचे पाणी 207.49 मिटरवर पोहचले होते. ही पातळी गाठण्यासाठी आता जेमतेम दोन मीटरचीच कमी आहे.