नवी दिल्ली – देशात दिल्ली-जयपुर मार्गावर इलेक्ट्रीक हायवे ही नवीन संकल्पना राबवली जाणार आहे. सध्या केवळ या प्रस्तावावर विचार सुरू आहे. त्या संबंधात विदेशी कंपन्यांशी आपल्या मंत्रालयाची चर्चा सुरू आहे अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली.
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेच्या कामाची त्यांनी राजस्थानात दौसा येथे जाऊन पहाणी केली. त्यावेळी ते बोलत होते. या मार्गावर केवळ इलेक्ट्रीकवरच चालणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. ते म्हणाले की देशात आता पेट्रोल आणि डिझेलचा वापर बंद व्हावा असाच आमचा प्रयत्न आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान दिल्ली-मुंबई या नवीन एक्स्प्रेस वे मुळे या दोन शहरांमधील प्रवासाचे अंतर निम्म्याने कमी होणार आहे. सध्या दिल्ली-मुंबई प्रवासाला 24 तास लागतात. हा नवीन महामार्ग तयार झाल्यानंतर हे अंतर 12 तासांनी कमी होणार आहे. हा महामार्ग दिल्ली, हरियाणा,राजस्थान, मध्यप्रदेश, आणि गुजरात या राज्यांमधून जाणार आहे.