– 21 ऑगस्टला मुंबईत सर्वपक्षीय जनआंदोलन
– विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी
मुंबई (प्रतिनिधी) – “ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा’ असे म्हणत मुंबईत आज सर्व विरोधी पक्षांनी एल्गार पुकारला. आगामी विधानसभा निवडणूक ईव्हीएमवर नकोत, तर मतपत्रिकांवरच घ्या, या मागणीसाठी ईव्हीएमविरुद्ध राज्यातील सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. ईव्हीएमला विरोध करण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार असून त्याला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रात घरोघरी फॉर्मवाटप करून ईव्हीएमसंदर्भात जनतेचे मत जाणून घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
ईव्हीएमविरुद्ध राज्यातील सर्व विरोधी पक्ष एकवटले असून विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली. वांद्रे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शेकाप नेते जयंत पाटील, लोकभारतीचे कपिल पाटील,आपचे ब्रि.सुधीर सावंत, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, जद सेक्युलरचे माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील आदींचा यात समावेश होता.
ईव्हीएममध्ये जी मुख्य चीप असते ती अमेरिकेत बनते. त्या अमेरिकेतच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीत रशियाचा हात असल्याचा आरोप झाला. त्या अमेरिकन चीपवर आम्ही विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल करीत आपला निवडणूक आयोगावर विश्वास राहिलेला नाही. माझ्या प्रश्नांना निवडणूक आयुक्तांकडे उत्तरे नव्हती. लोकशाही देशात जनता सार्वभौम असते म्हणून आता आम्ही जनतेसमोरच जाणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकून आलेल्यांना देखील आपल्या विजयावर विश्वास नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत 220-250 जागांवर विजय मिळणार असा दावा करतात ना? मग त्यांना मतपत्रिकेवर निवडणूका घेण्यास हरकत काय आहे? ते ईव्हीएमला कवटाळून का बसले आहेत? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
घराघरांत अर्ज वाटणार
निवडणुका ईव्हीएमवर नकोत तर मतपत्रिकेवर घ्या, अशी मागणी करणारे अर्ज विरोधी पक्षांकडून राज्यातील घराघरात वाटले जाणार असून हे अर्ज निवडणूक आयोगाला देण्यात येतील. 21 तारखेला मुंबईत ईव्हीएम विरोधी मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा राजकीय नसेल. मी सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. या मोहिमेला ममता बॅनर्जी यांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे. प्रत्येक राज्यातून ईव्हीएमविरोधी उठाव होणार असून त्याची सुरूवात महाराष्ट्रातून होत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे यापुढे आंदोलनात राजकीय पक्षांचा झेंडा किंवा चिन्ह नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ईडीचा मला फरक पडत नाही- राज ठाकरे
कोहिनूर टॉवर प्रकरणी ईडी कडून चौकशीला बोलाविण्यात येणार असल्याच्या बातम्या छापून आल्या आहेत. त्याबाबत राज ठाकरेंना विचारले असता, हे सर्व काही मला प्रसारमाध्यमांकडूनच कळत आहे. मला अद्याप कोणी ईडीचा अधिकारी विचारायला आलेला नाही. मला त्याचा काही फरकही पडत नाही. मात्र भिती दाखविण्याचा हाच प्रकार सध्या वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्यांच्या मालकांवर सुरू आहे. अनेक पत्रकारांना त्यांची भूमिकाही मांडू दिली जात नसल्याचा आरोपही राज ठाकरे केला.
मतपत्रिकांवर मतदान घ्या, संभ्रम दूर करा – अजित पवार
ईव्हीएम नकोत ही मागणी याआधी अनेक स्वयंसेवी संस्था आदींनी केली आहे. काही जण निवडणुकांआधी आम्हाला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवितात, तितक्याच जागा त्यांना मिळतात. या सगळ्यांमुळे देशातील जनतेत संभ्रमाचे वातावरण आहे. हे दूर करायचे असेल तर विधानसभा ईव्हीएमवर न घेता मतपत्रिकांवर घ्या आणि संभ्रम दूर करा इतकीच आमची मागणी आहे.या मागणीला आम्ही आता जनआंदोलनाचे स्वरूप देणार असल्याचेही राष्ट्रीवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले. ईव्हीएम नकोत मतपत्रिका हवी ही मागणी काही कोणावर अविश्वासाने करण्यात आलेली नाही. मतदानप्रक्रिया पारदर्शक व्हावी हाच आमचा उद्देश आहे, असेही पवार म्हणाले.
लोकसभेचे निकाल धक्कादायक – बाळासाहेब थोरात
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेक पत्रकार देखील आपले अंदाज कसे चुकले हे पाहून बुचकळयात पडले. गावागावातही आश्चर्याचेच वातावरण होते. जिथे पारदर्शकता हवी तिथे ती नसणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. म्हणून जनतेने देखील आता या आंदोलनात सहभाग घ्यावा असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.
सरकारला हलविण्याची वेळ आली – भुजबळ
ईव्हीएमवर आमचा विश्वास नाही. अमेरिका, जपान यांनी हे तंत्रज्ञान फेकून दिले मग आपण का वापरायचे? असा सवाल करीत मतपत्रिकेवर निवडणुका घ्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. आता या सरकारला गदागदा हलविण्याची वेळ आली असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.
येत्या 15 ऑगस्टला ग्रामसभेत ठराव करा!
स्वातंत्र्यदिनी ग्रामसभा भरत असते.राज्यातील ग्रामीण भागाने या ग्रामसभेत ईव्हीएम नकोत तर मतपत्रिकांवरच विधानसभा निवडणूका घेण्यात याव्यात असा ठराव करावा असे आवाहन राजू शेट्टी आणि शेकाप नेते जयंत पाटील यांनी केले.