मुंबई: मुंबईतील काही प्रयोगशाळांमधून करोनाच्या चाचण्यांचे अहवाल येण्यास विलंब होत असल्याची कबुली महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी दिली आहे. काही चाचण्यांमध्ये हा विलंब कमाल 18 दिवस इतका झाला आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.
ज्या प्रयोग शाळांमधून चाचण्यांना विलंब होंत आहे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्याकडून या बाबतीत होणारा विलंब अक्षम्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आता आपण या प्रयोगशाळांना चोवीस तासात अहवाल देण्याचा आदेश दिला असून असे न केल्यास त्यांचा मुंबईतील परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
आयसीएमआर कडून चाचण्यांचे जे निकष निश्चित करण्यात आले आहेत त्यानुसार आपण मुंबईत सध्या फक्त 3600 चाचण्या दर दिवशी करू शकतो. त्यापेक्षा अधिकची क्षमता नाही असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
मुंबईत सुमारे अडीच हजार हॉस्पिटल्स असून त्या सर्व रुग्णालयांना करोना चाचणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. आयसीएमआरने रुग्णांचे स्वॅब नमुने घरातून कलेक्ट करण्यास प्रतिबंध केला आहे. पण आम्ही गरज म्हणून त्या नियमाच्या बाहेर जाऊन रुग्णांचे नमुने त्यांच्या घरातून घेत आहोंत असेही त्यांनी स्पष्ट केले.