देहूगाव – तीर्थक्षेत्र देहूतील नव्याने वाढत्या वसाहतीत अंतर्गत नव्याने मल नि:सारण पाइप लाइन टाकणे. नादुरूस्त पाइप लाइनची दुरूस्ती व एचटीपी पंप क्षमता वाढविणे. इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त राखण्यासाठी आणि मैला मिश्रित सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने आराखडा तयार करण्यात आला आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर त्वरित काम करण्यात येईल, अशी माहिती नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी दिली.
देहू ग्रामपंचायत असताना तीर्थक्षेत्र विकास आराखडाअंतर्गत सुमारे ४० कोटी रुपयांचे भुमिगत मल नि:सारण पाइपलाइनचे ( ड्रेनेज ) काम करण्यात आले होते. अनेक ठिकाणी नादुरुस्त चेंबर, भूमिगत पाइपलाइन जोडले नसून पावसाच्या पाण्याची भूमिगत पाइप चेंबरला जोडल्याचे चित्र आहे. भूमिगत मल नि:सारण पाइपलाइन व ठिकठिकाणीच्या मुख्य चेंबरला इतर चेंबर जोडल्याची माहिती व नकाशा नगरपंचायतीकडे नाही. त्यामुळे दुरुस्तीच्या काम करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. पाइपलाइन व चेंबर अनेक ठिकाणी फुटल्याने दूषित पाणी नदीपात्रात मिसळत आहे. तसेच हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आरोप होत आहे.
वाढत्या नागरीकरणामुळे नव्याने निर्माण होणाऱया वसाहती व मोठमोठ्या गृहप्रकल्पांना भूमिगत मलनिसरण पाइपलाइन नसल्याने तेथील दूषित व मैला मिश्रीत सांडपाणी ओढ्यात सोडले जाते. पुढे ते दूषित पाणी नदीपात्रात मिसळत आहे. त्यातच नदीपात्रात वेढलेल्या जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजनची कमतरता निर्माण होत आहे. दूषित पाण्यामुळे जलचरांनाही धोका निर्माण झाला आहे. तर तीर्थक्षेत्र देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनात येणारे भाविक इंद्रायणी नदीपात्रातील जल तीर्थ म्हणून प्राशन करीत असतात. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची ही शक्यता नाकारता येत नाही.
इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त राहावी आणि नव्याने वाढणाऱ्या वसाहतीमधील मैला मिश्रित सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार केला आहे. त्यासाठी कोट्यावधी रुपये प्रस्ताविक खर्च असल्याने राज्य शासनाकडे व जिल्हा प्रशासनाकडे निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू असून निधी उपलब्ध होताच काम करण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी घार्गे यांनी दिली.