देहूगाव – राज्य शासनाने पालखी सोहळ्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर श्री संत तुकाराम महाराज संस्थानने नाराजी व्यक्त केली आहे. मोजक्याच वारकऱ्यांमध्ये अखंड पायी वारीच्या निर्णयावर संस्थान ठाम आहे. अखंड पायी वारीसाठी जैवसुरक्षा कवच (बायोबबल) बाबत विचार करून निर्णयात फेरबदल करण्याची मागणी संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे यांनी व्यक्त केली आहे.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख हभप भानुदास महाराज मोरे, हभप अजित महाराज मोरे, हभप संजय महाराज मोरे, विश्वस्त हभप माणिक महाराज मोरे, हभप संतोष महाराज मोरे, हभप विशाल महाराज मोरे या वेळी उपस्थित होते.
संस्थानचे अध्यक्ष, पालखी सोहळा प्रमुख आणि संस्थानचे विश्वस्त म्हणाले, पालखी सोहळा हा आध्यात्मिक संस्कृती जोपासणारा असून, महाराष्ट्राचा मान वाढविणारा सोहळा आहे. संतांच्या आध्यात्मिक संदेशातून जगाला मार्गदर्शनच केले आहे. शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या पायी वारीचा, वारकरी, भाविकांचा भावनांचा विचार करीत अखंड पायीवारीचा निर्णय घ्यावा.
प्रतिकूल परिस्थितीतही मोजक्याच वारकऱ्यांमध्ये 19 दिवसांचा असणारा प्रवास, 10 दिवसांमध्ये करण्याचा आणि आवश्यकतेनुसारतेही रात्रीचा पायी वारी प्रवास करीत बंदिस्त वाहनातून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन जाण्याच्या परवानगीचा प्रस्ताव मांडला होता. अखंड पायी वारीसाठी या जेैवसुरक्षा कवच (बायोबबल) बाबत शासनाने विचार करावा. तसेच घेतलेल्या निर्णयात फेरबदल करण्याची मागणी करीत अखंड पायी वारीसाठी संस्थान ठाम असल्याचे या वेळी सांगण्यात आले.