पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर नोकर भरतीवर निर्बंध असून, त्याचा परिणाम प्रशासनावर पडत आहे. परिणामी, शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदांच्या संख्येत भर पडत आहे.
राज्य शासनाच्या शासकीय कार्यालये व जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी असे एकूण 2 लाख 193 पदे पदे रिक्त असल्याची बाब माहिती अधिकारातून पुढे आली आहे. पण, दुसरीकडे बेरोजगार तरुणांची संख्या वाढत असताना, शासन या पदभरतीबाबत निर्णय घेत नसल्याने अनेकांची स्वप्नं भंगली आहेत.
राज्यातील लाखो उमेदवार स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. शासकीय सेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र नियोजनपूर्वक अभ्यास करीत आहेत. मात्र, मात्र गेल्या काही वर्षांपासून राज्यातील रिक्त पदांचा आकडा वाढत असूनही राज्य शासनाकडून ही पदे भरण्यात आलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर सूरज गज्जलवार यांनी माहिती अधिकारात वर्ग-1 ते वर्ग-2च्या रिक्त पदांचा तपशील राज्य शासनाकडे मागितला होता.
सामान्य प्रशासन विभागाने 31 डिसेंबर 2019 अखेर राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदांमध्ये 2 लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याचे नमूद केले आहे. परंतु काही विभागांकडून माहिती उपलब्ध न झाल्याने त्या विभागातील रिक्त पदांचा समावेश आकडेवारीत नसल्याचे म्हटले आहे.
रिक्त जागांचे आकडे
राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदांमध्ये मिळून 10 लाख 99 हजार 104 मंजूर पदे आहेत. त्यातील 7 लाख 80 हजार 523 पदे सरळसेवेची, 3 लाख 18 हजार 581 पदे पदोन्नतीची आहेत. त्यापैकी 8 लाख 98 हजार 911 पदे भरलेली आहेत. तर 2 लाख 51 हजार 193 पदे अद्याप रिक्त आहेत. त्या पैकी 1 लाख 41 हजार 329 पदे सरळसेवेने, तर 58 हजार 834 पदे पदोन्नतीने भरायची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रिक्त जागांचा आकडा आणखी जास्त
राज्य शासनाने डिसेंबर 2019 अखेरच्या रिक्त पदांची माहिती दिली आहे. त्यामुळे त्या पुढील दीड वर्षांत आणखी काही पदे रिक्त झाली आहेत. तसेच “महापरीक्षा’ संकेतस्थळाद्वारे 35 हजार पदांची भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे रिक्त पदांची आकडेवारी तीन लाखांच्या घरात जाते. इतकी पदे रिक्त असणे ही बाब गंभीर आहे. तरुणांचा विचार करता ही पदभरती तातडीने सुरू करणे आवश्यक आहे, असे माहिती अधिकार कार्यकर्ते सूरज गज्जलवार यांनी सांगितले.
कंत्राटी नोकरभरतीचा हट्ट
रिक्त असलेल्या पदांपैकी 1 लाख 41 हजार 329 पदे सरळ सेवेने, तर 58 हजार 864 पदे पदोन्नतीने भरायची आहेत. इतकी पदे रिक्त असताना राज्य शासनाच्या विविध विभागाकडून कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रित पदांसाठी भरती प्रक्रिया कधी सुरू होईल, याकडे राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी उमेदवारांचे लक्ष लागले आहे.